
मुंबई : महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी आणि अॅपआधारित कॅब चालकांना मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान असणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाची अंमलबजावणी करत प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून १८ ऑगस्टपासून चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे.
प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येतो का, दिशा सांगता येतात का आणि भाड्यासंदर्भातील प्राथमिक संभाषण करता येते का, याची पडताळणी केली जात आहे. या निर्णयाचा उद्देश प्रवाशांना स्थानिक भाषेत सहज सेवा मिळावी आणि चालक-प्रवासी संवादातील अडचणी दूर व्हाव्यात, असा परिवहन विभागाचा दावा आहे.
या तपासणीत केवळ नवीन चालकच नव्हे, तर यापूर्वीच परवाना आणि परवाना-अनुज्ञप्ती असलेल्या चालकांचाही समावेश करण्यात आला आहे. मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याऐवजी सुरुवातीला कारणे दाखवा नोटीस देऊन मराठी शिकण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. साधारणतः एक महिन्याची संधी दिल्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास परवाना किंवा परवाना-अनुज्ञप्ती निलंबित अथवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
दरम्यान, १६ ऑगस्टपर्यंत सुमारे ७ हजार ७५० रिक्षाचालक मराठी प्रावीण्य चाचणीत अपयशी ठरले आहेत. त्यांना पुन्हा चाचणी द्यावी लागणार आहे. तर तब्बल १७ हजार ४२७ चालकांनी अद्याप आवश्यक मराठी प्रशिक्षण पूर्ण केलेले नसल्याची माहिती समोर आली आहे.
चालकांना दैनंदिन व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या मराठी संभाषणाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे. मात्र, या नियमामुळे अमराठी भाषिक चालकांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आरटीओची तपासणी, पुनर्परीक्षा आणि प्रशिक्षणाची प्रक्रिया आगामी काळात अधिक महत्त्वाची ठरणार आहे.




