
नागपूर -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच आघाडी घेतली आहे.
मुलींचा निकाल ९३.१५ टक्के तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला आहे. राज्यभरात एकूण १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
नागपूर विभागाचा निकाल यंदा ८८.६७ टक्के लागला असून, राज्याच्या सरासरीपेक्षा किंचित कमी असला तरी समाधानकारक कामगिरी मानली जात आहे. नागपूर विभागात विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करत स्पर्धा टिकवून ठेवली आहे.
यंदा कोकण विभागाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावत ९४.१४ टक्के निकाल लावला, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के लागला आहे. मुंबई (९०.०८%) आणि पुणे (९१.२५%) विभागांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. तसेच डिजीलॉकरवर डिजिटल मार्कशीटही उपलब्ध होणार आहे.
निकालानंतर गुण पडताळणीसाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.








