मुंबई/नागपूर: महाराष्ट्राने ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात उच्चांक गाठला असून विजेची मागणी दररोज वाढती आहे. हे लक्षात घेता राज्याला दररोज 32 रॅक कोळसाची गरज असून तेवढा कोळसा मिळाला पाहिजे, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीत आयोजित एका पत्रपरिषदेत दिली.
कोळसा मंत्रालयाच्या अधिकार्यांसोबत आज ना. बावनकुळे यांनी दिल्लीत बैठक आयोजित केली होती. राज्यातील जनतेला मुबलक वीज मिळावी यासाठी वीजनिर्मिती वाढविण्याची गरज आहे. राज्याला सिंगरौनी कोळसा खाण, वेकोलिच्या महानदी, वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेड या कंपन्यांमधून कोळसा उपलब्ध होतो. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कोळसा मिळण्यासंदर्भातील झालेल्या करारानुसार कोळसा नियमित मिळावा म्हणून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रयत्न केले. महानिर्मिती आणि केंद्रीय कोळसा विभागाची बैठक घेण्याची सूचना गोयल यांनी केली होती. त्याप्रमाणे आज शास्त्री भवन येथे व्हिडिओ कॉन्सफरसिंगद्वारे ही बैठक घेण्यात आल्याचे ना. बावनकुळे यांनी सांगितले.
राज्यात ऑक्टोबर हिटमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. 24142 मेगावॉटपर्यंत ही मागणी गेली आहे. ऑक्टोबर महिन्यात 19 हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज निर्माण झाली नाही. सध्या राज्याला 1 लाख 40 हजार टन कोळश्याची आवश्यक असल्याचे सांगताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले- राज्यातील 7.50 लक्ष शेतकर्यांना वीज जोडणी दिली आहे. घरगुती ग्राहकांच्या वीज जोडणीतही वाढ झाली आहे.
त्यामुळे विजेची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. राज्याला दररोज लागणारा 32 रॅक कोळसा लवकर मिळावा, यासाठी आज वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठक झाली. या संदर्भात कोळसा विभागाच्या अधिकार्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
