नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठ महिने झाले असले तरी विरोधकांचा संशय कायम आहे. काँग्रेसने या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले.
सपकाळ म्हणाले, “संध्याकाळी ६ नंतर अचानक ७४ लाख मतं कशी वाढली? हे एक खुले गूढ आहे. ही निवडणूक नव्हे तर ‘मॅच फिक्सिंग’ होती.” यामागे अतिरिक्त निवडणूक आयुक्त किरण कुलकर्णी यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आणि त्यांच्यावर नार्को टेस्ट घेण्याची मागणी केली.
मतांची चोरी झाली-
सपकाळ म्हणाले, “कुलकर्णी हे मतांच्या हेराफेरीचे मास्टरमाइंड आहेत. त्यांच्याच काळात मतांची आकडेवारी अचानक वाढली. ही लोकशाहीवरची थेट गदा आहे.”
आयोगावर संशय-
सपकाळ यांनी निवडणूक आयोगावरही टीका केली. “आयोग अमित शहांच्या इशाऱ्यावर काम करत आहे. फडणवीस मुख्यमंत्री होण्यापूर्वीच आम्ही तक्रार केली होती. पण आयोगाने उलट नियमच बदलले,” असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींनीही संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. राजकारणापेक्षा लोकशाही अधिक महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही चौकशीची मागणी करत आहोत, असे सपकाळ म्हणाले.
न्यायालयीन चौकशीची मागणी-
या सर्व घडामोडींवरुन न्यायालयीन चौकशी आणि नार्को टेस्ट ची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. या आरोपांनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजण्याची शक्यता आहे.