
नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 2023 मध्ये बदललेल्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली जाते, ज्यामध्ये विरोधकांचा आवाज दुर्लक्षित राहतो.राहुला गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये पानभर लेखामध्ये पाच 5 स्टेपमध्ये या षड्यंत्राचा आराखडा मांडला आहे. यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि CCTV/पुरावे लपवण्याचे सांगितलं आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या सर्व घडामोडींना “Match-fixing” असल्याचे म्हटले आहे. जिथं निकाल आधीच ठरवले होते. शेवटी, ते म्हणतात की “मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे, असल्याचा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
नियुक्ती प्रक्रिया ‘एकतर्फी’ –
राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या नियमानुसार निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांच्या समितीद्वारे होते. मात्र या समितीत केंद्र सरकारच्या दोन सदस्यांना बहुमत असल्यामुळे विरोधकांचा मतप्रवाह निर्णायक ठरत नाही. त्यानुसार ही निवड एकतर्फी होते, असे राहुल गांधींचे मत आहे.
महाराष्ट्रात मतदारसंख्येत संशयास्पद वाढ-
मतदारयादीमध्ये बोगस नावे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करताना त्यांनी महाराष्ट्रातील आकडेवारी मांडली. मे 2024 मध्ये 9.29 कोटी असलेली मतदारसंख्या नोव्हेंबरमध्ये 9.70 कोटींवर पोहोचल्याचे ते म्हणाले. अवघ्या सहा महिन्यांत 41 लाखांची भर पडणे शंका निर्माण करणारे आहे, असंही त्यांनी नमूद केलं. त्यापैकी केवळ 15 लाखांनीच मतदान केल्याचं दाखल करून उर्वरित नावे बनावट असावीत, असा आरोप त्यांनी लावला आहे.
मतदानात टक्केवारीत ‘अचानक’ वाढ-
राहुल गांधी यांनी मतदानाच्या दिवशी ५ वाजेपर्यंत ५८.२२% मतदान झाल्याचे सांगितले. मात्र अंतिम आकडेवारी ६६.०५% इतकी दाखवण्यात आली. यामध्ये अचानक ७.८३% वाढ झाली, जी सुमारे ७६ लाख मतांच्या समकक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढ संशयास्पद असून, बनावट मतांच्या जोरावर टक्केवारी वाढवली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
विशिष्ट मतदारसंघांमध्ये बनावट मतदानाचं लक्ष केंद्रीत-
राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, सुमारे ८५ विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपच्या विजयासाठी हेतुपुरस्सर बनावट मतदान केलं गेलं. उदाहरण म्हणून त्यांनी कम्भ मतदारसंघात १.३४ लाख मतांपैकी भाजपला १.१९ लाख मते मिळाल्याचं सांगितलं, जे ८९% पेक्षा अधिक आहे. पारनेरमध्ये तर एकूण मतदारसंख्या आणि भाजपला मिळालेल्या मतांची संख्या एकसारखीच असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
CCTV फूटेज, EPIC क्रमांक, EVM संदर्भात गंभीर आरोप-
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुरावे लपवण्याचा आरोप करत सांगितले की, EVM आणि CCTV फूटेजबाबत विरोधकांच्या मागण्या आयोगाने फेटाळल्या. 1961 च्या नियमात बदल करून CCTV डेटा जनतेसमोर येऊ नये, असे सरकारने केले. तसेच EPIC कार्डवर एकसारखे क्रमांक दिसून आले असून, यामुळे डुप्लिकेट मतदारांचा संशय निर्माण होतो, असं ते म्हणाले.