Published On : Tue, Jul 17th, 2018

दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी येण्याची वाट बघताय का?: मुंडे

Advertisement

दूध उत्पादकांना अनुदान देण्याच्या मागणीवरुन राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले. दूध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दूध डेअरी आणि पतंजलीचे दूध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. या दूधबंद आंदोलनाचे पडसाद मंगळवारी देखील विधिमंडळात उमटले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला.

देशातील पहिला शेतकरी संप राज्यात झाला. मार्च महिन्यात मुंबईच्या विधानभवनावर शेतकऱ्यांचा पायी मोर्चा आला आणि आता शेतकऱ्यांना रस्त्यावर दुध ओतावे लागत आहे. प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय द्यायचाच नाही, असे धोरण सरकारने ठरवले आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. दुग्धविकास राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या शेतकरी दुधात पाणी टाकतात या वक्तव्याचा समाचार घेताना मुंडे म्हणाले, नागपुरच्या सरकारला शेतकऱ्यांचे दु:ख, वेदना समजत नाहीत. दुधातले पाणी कसे दिसते?.

सरकारने २६ जून २०१७ रोजी गाईच्या दुधाला २७ रूपये आणि म्हशीच्या दुधाला ३६ रूपये भाव जाहीर केला. मात्र, शेतकऱ्यांना केवळ १७ रूपये भाव मिळत आहे. आंदोलन केल्यानंतरही सरकार केवळ मलमपट्टी करण्याचे धोरण अवलंबित आहे. केवळ घोषणांमुळे दुध उत्पादकांचे पोट भरणार नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरल्याचे त्यांनी सांगितले.