Published On : Wed, May 24th, 2017

मागिल वर्षी दिले होते सुमारे 10 कोटींहून अधिकचे व्याज

Advertisement

Mahavitaran Logo Marathi
नागपूर :
वीज ग्राहकांना नेहमीच्या वीजबिलांसमवेत यावेळी अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बील देण्यात येत असून, वीज ग्राहकांनी या बिलांचा वेळीच भरणा करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणकडे जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर नागपूर परिमंडलातील लघुदाब वीज ग्राहकांना मागिल वर्षी तब्बल 10 कोटी 95 लाख 50 हजार 533 रुपये व्याज दिले होते त्यापैकी नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांना 8 कोटी 38 लाख 79 हजार 227 रुपये तर वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहकांना 2 कोटी 56 लाख 71 हजार 326 रुपयांच्या व्याजाची ग्राहकांच्या वीजबिलात समयोजित करण्यात आली होती तर आर्थिक वर्ष 2016-17 साठी दिल्या जाणा-या व्याजाचि रक्कम वीजबिलात समायोजित करणे सुरु आहे.

सुरक्षा ठेव म्हणजे काय? दरवर्षी ती का घेतल्या जाते? त्यावर व्याज मिळते का? असे एक नाही तर असंख्य प्रश्न सामान्य वीज ग्राहकाला नेहमीच पडत असतात. मुळात वीज ग्राहकांकडून घेण्यात येत असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांच्याच कल्याणासाठी महावितरणतर्फ़े वापरल्या जाते, एवढेच नव्हे तर त्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी निश्चित केलेल्या दरानुसार व्याजही दिल्या जाते. महावितरण ही ग्राहकांच्याच भरवश्यावर चालते, ग्राहकांनी भरणा केलेल्या वीज बिलाच्या रकमेतूनच वीज खरेदी, वीजवहन आणि वितरण, देखभाल आणि दुरुस्ती तसेच प्रशासनावरील खर्च भागविल्या जातो. अश्या वेळी ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे बील नियमित भरले तरच वीज खरेदी व वितरण करणे महावितरणला सहज शक्य होते. वीजपुरवठा करतांना महावितरण ग्राहक हितास बांधिल राहून तसेच कायद्याच्या चौकटितच कार्यरत आहे. वीज कायदा 2003 च्या तरतुदीप्रमाणे महावितरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अधिन राहून तसेच आयोगाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवरच ग्राहकांना वीज पुरवठा करीत आहे.

महावितरण सुरक्षा ठेव का घेते? याचे उत्तरही वीज कायदा 2003 मध्ये आहे. ग्राहकांना मिळणारे वीजेचे बील हे त्यांचा एक महिना आधी वापरलेल्या वीजेपोटी असते, म्हणजेच आधी वापर व त्यानंतर बील असा हा क्रम आहे. वीज बिल आल्यानंतरच ग्राहक ते भरत असतो. म्हणजेच वीज बिल आल्यानंतर ते भरण्यासाठी साधारणत: 18 ते 21 दिवसांचा कालावधी ग्राहकाकडे असतो. म्हणजेच वितरीत केलेल्या वीजेचे पैसे महावितरणकडे सुमारे दीड महिन्यानंतर येतात. अश्या परिस्थितीत वीज वितरण कंपनीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वीज कायदा 2003 च्या कलम 47 च्या उपकलम (5) व उपकलम (1) अन्वये सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांना वितरण कंपनीकडे सुरक्षा ठेव जमा करने बंधनकारक आहे. ग्राहकाला आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी इतके वीजबिल सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनी कडे जमा करावी लागते.

याशिवाय वीज वितरण कंपनी वर्षातून एकदा वीज वापराच्या अनुषंगाने सुरक्षा ठेवीचे पुनर्निधारण करु शकते. एखाद्या ग्राहकाची सुरक्षा ठेव ही त्याच्या आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी रकमेपेक्षा कमी असेल तर संबंधित ग्राहकाला अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिल्या जाते. वीज ग्राहकांनी यापूर्वी सुरक्षा ठेव जमा केली असली तरी वीजदर आणि वीजवापर यामुळे वीजबिलाची रक्कम वाढली असेल तरच त्यातील फ़रकाच्या रकमेचे बील म्हणून अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बील दिल्या जाते. वीज ग्राहकांनी जमा केलेल्या सुरक्षा ठेवीवर कालावधिनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे व्याज देण्याचेही नियामक आयोगाचे निर्देश आहेत. महावितरणकडे जमा असलेली सुरक्षा ठेव ही ग्राहकांचीच रक्कम असून वीज पुरवठा कायमस्वरुपी बंद करतेवेळी ही ठेव ग्राहकाला व्याजासह परत केल्या जाते. यामुळे ग्राहकांनी अतिरीक्त सुरक्षा ठेवीचा वेळीच भरणा करुन सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.