
नवी दिल्ली: दिल्लीतील कथित मद्य (अबकारी) धोरण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाळा हाऊस कोर्ट यांनी आज (दि. २७) दिलेल्या निर्णयात दोन्ही नेत्यांसह एकूण २३ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
विशेष न्यायाधीश जितेंद्र सिंह यांनी पुराव्याअभावी सर्व आरोप फेटाळून लावत हा निर्णय दिला. न्यायालयाचा निकाल जाहीर होताच न्यायालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आज सत्याचा विजय – केजरीवाल
निर्णयानंतर माध्यमांशी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, “गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षाकडून आमच्यावर कथित मद्य घोटाळ्याचे आरोप करण्यात येत होते. मात्र आज न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून लावत आम्हाला निर्दोष ठरवले आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आज सत्याचा विजय झाला आहे.”
यावेळी केजरीवाल यांनी सिसोदिया यांना मिठी मारत भावना व्यक्त केल्या. दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेले पाहायला मिळाले.
संविधानाचा अभिमान – सिसोदिया
निर्दोष मुक्ततेनंतर मनीष सिसोदिया यांनीही प्रतिक्रिया दिली. “आज आम्हाला पुन्हा एकदा आपल्या संविधानाचा आणि हे संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिमान वाटतो. न्यायालयाने सत्याला न्याय दिला आहे,” असे ते म्हणाले.
राजकीय परिणामांची चर्चा-
या निकालानंतर राजधानीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विरोधकांकडून या प्रकरणाचा राजकीय वापर केल्याचे आरोप केले जात असताना, न्यायालयाच्या निर्णयामुळे आम आदमी पक्षाला मोठा नैतिक विजय मिळाल्याची चर्चा आहे.
दिल्लीतील अबकारी धोरण प्रकरण अनेक महिन्यांपासून चर्चेत होते. मात्र आजच्या निकालानंतर या प्रकरणाला कायदेशीरदृष्ट्या पूर्णविराम मिळाला आहे.








