Published On : Fri, Dec 29th, 2017

कमला मील अग्नितांडवाची आयुक्तांमार्फत चौकशी अमान्य, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा!: विखे पाटील

Advertisement

BMC Mumbai
मुंबई: मुंबईच्या कमला मील कंपाऊंडमधील हॉटेल्सला आग लागून झालेला १४ जणांचा मृत्यू हे मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचे बळी आहेत. मुंबई शहर भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीच्या तोंडावर असून, आणखी किती मुंबईकरांना आपले प्राण देऊन या अव्यवस्थेची किंमत मोजावी लागेल, अशी संतप्त विचारणा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मुंबईतील अशा घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी गुरूवारी मध्यरात्री घडलेल्या या अग्नीतांडवातील पीडितांच्या कुटुंबियांप्रती आपली संवेदना प्रकट केली. त्यानंतर या घटनेवरून राज्य सरकार व मुंबई महापालिकेवर तोफ डागताना ते म्हणाले की, पोलिसांनी संबंधित हॉटेलमालकांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, या घटनेसाठी हॉटेलमालकांसोबतच महापालिकेचे वॉर्ड ऑफिसर, नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांपासून आयुक्तांपर्यंत सारेच दोषी आहेत. या हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम झालेले होते, बांधकामामध्ये आगीला पोषक असे साहित्य मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले होते, आग लागल्यास ती विझविण्याची सक्षम यंत्रणा तर सोडाच पण बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग देखील या ठिकाणी उपलब्ध नव्हता. या साऱ्या त्रुटींसाठी केवळ हॉटेलमालकच नव्हे तर मुंबई मनपा देखील तेवढीच जबाबदार आहे. येथील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेकडे लेखी तक्रारसुद्धा करण्यात आली होती. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून १४ जणांच्या मृत्युसाठी कारणीभूत ठरल्याबद्दल मनपा अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली.

या अग्नितांडवाची मुंबई महापालिका आयुक्तांकडून चौकशी करण्याच्या निर्णयावरही त्यांनी टिकेची झोड उठवली. ते म्हणाले की, मुळातच या घटनेसाठी सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकाच जबाबदार आहे आणि त्याच महापालिकेच्या आयुक्तांकडून चौकशी करणे म्हणजे निव्वळ मलमपट्टी ठरेल. या घटनेची आयुक्तांमार्फत होणारी चौकशी आम्हाला मान्य नसून, मागील २ वर्षात मुंबईत इमारत कोसळून व आगी लागून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या सर्वच घटनांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

मुंबई महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराला राजाश्रय असल्याने सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करता वाट्टेल ते परवाने सहजगत्या उपलब्ध आहेत. त्याविरूद्ध आक्षेप नोंदवल्यास त्याची दखलही घेतली जात नाही. त्यामुळेच मुंबई शहरात नित्यनेमाने कधी इमारत कोसळून तर कधी आग लागून अनेकांचे मृत्यू होत आहेत. भेंडीबाजार परिसरात फक्त चॅनलचा वापर करून ९ मजली इमारत उभी होते आहे. त्याविरूद्ध तक्रारी झालेल्या असतानाही त्याची दखल घ्यायला महापालिका तयार नाही. भविष्यात ही इमारत कोसळून अघटीत घडले तरच मनपाला जाग येईल. दरवेळी केवळ तोंडदेखील कारवाई करून अशा दुर्दैवी घटनांना दडपले जात आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले.

मुंबईत सध्या सुरू असलेल्या हॉटेल्समध्येच ग्राहकांची सुरक्षितता धोक्यात आहे. त्याकडे लक्ष देण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला वेळ नाही आणि त्यांचे नेते रूफ टॉप हॉटेल्सचा आणखी एक बालहट्ट धरून बसले आहेत. कमला मील कंपाऊंडमधील हॉटेलदेखील छतावर होते. पण आग लागल्यानंतर खाली उतरायला जागाच नसल्याने अनेकांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला. शिवसेना नेत्यांच्या रूफ टॉप हॉटेलच्या धोरणामुळे हा आगीच्या घटनांचा धोका अधिक वाढण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली.

या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी राज्य सरकारवरही टीकास्त्र सोडले. राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या अधिपत्याखालील मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक डोळेझाक चालवली आहे. मुंबई मनपाही देशातील सर्वाधिक भ्रष्ट महानगर पालिका असून, येथील भ्रष्ट व्यवस्थेमुळे असंख्य कर्त्या व्यक्तींचे अकाली बळी जाऊन त्यांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत, तर अनेकांच्या आयुष्याची स्वप्ने ऐन तरूणाईतच उद्ध्वस्त झाली आहेत. मुंबई महापालिकेच्या नाकर्तेपणाबाबत आंधळेपणाचे सोंग घेणारा भारतीय जनता पक्ष आपली जबाबदारी टाळू शकत नाही. ते सुद्धा शिवसेनेच्या प्रत्येक पापात सारखेच भागिदार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले आहे.