मुंबई : राज्यात मराठी भाषेच्या सक्तीवरून सुरु असलेल्या वादात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुकांचं राजकारण आहे,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली.
फडणवीस म्हणाले, “महापालिका निवडणुका नसत्या, तर कदाचित आज विरोध झाला नसता. राज ठाकरे आणि आमची भूमिका वेगळी असली तरी ठाकरेंची भूमिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीयच वाटते. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी स्वतः त्रिभाषा धोरणावर आधारित माशेलकर समितीचा अहवाल स्वीकारला होता. आता त्याच अहवालावर आक्षेप घेत आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे. हे राजकीय भूमिकांमध्ये बदल आहे.
हिंदी सक्ती नाही, पर्यायी भाषा म्हणून समावेश-
फडणवीसांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात हिंदी सक्ती नाही, ती एक पर्यायी भाषा आहे. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र आहे – मराठी, इंग्रजी आणि एक अन्य भारतीय भाषा. विद्यार्थ्यांच्या मेंदूच्या विकासाच्या दृष्टीने लहान वयात भाषा शिकवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तीन भाषा शिकणं ही गरज आहे, सक्ती नव्हे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
“भावनांपेक्षा वस्तुस्थिती समजून घ्या”
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, “नवीन शैक्षणिक धोरणात तीन भाषा आवश्यक आहेत. अन्यथा विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळणार नाही. त्यामुळे त्यांचं नुकसान होईल. चांगले गुण असूनही जर क्रेडिट कमी असेल, तर ते स्पर्धेत मागे पडतील. भावनेवर न जाता वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे.”
तज्ज्ञांवरही शंका घेताय?
फडणवीसांनी सवाल केला की, “माशेलकर, मुणगेकर, थोरात यांच्यासारख्या तज्ज्ञांनी तयार केलेला अहवाल जर आपण स्वीकारलाय आणि आता त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावताय, तर त्या तज्ज्ञांना महाराष्ट्रद्रोही म्हणणार का?”
मराठीला प्राधान्य, पण हिंदी विरोध का?
ते पुढे म्हणाले, “मराठी आमची मायबोली आहे. तिची सक्ती असायलाच हवी. पण हिंदीला विरोध आणि इंग्रजीला नाही, हा विरोधाभास आहे. मराठी आणि हिंदीमध्ये स्पर्धा झाली, तर मराठीलाच आम्ही प्राधान्य देतो. पण इतर भाषांचा अभ्यासही विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे.”