मुंबई : सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल)ची धूम सुरू आहे. मात्र यातच पाण्यावरून आता मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) दणका दिला आहे. आयपीएलमध्ये पिंपरी चिंचवड येथील गहुंजे मैदान आणि खेळपट्टीच्या देखभालीसाठी पवना जलसिंचन प्रकल्पातून घेण्यात येणार होते. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने पवना जलसिंचन प्रकल्पातून पाणी घेण्यास नकार दिला आहे. क्रिकेटच्या खेळपट्टीसाठी ‘पवना’तून पाणी घेणे बेकायदा आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
यंदा कावेरी तंट्यामुळे आयपीएलचे चेन्नई येथे होणारे सामने पुण्यात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)पुण्यातील मैदानासाठी पवना जलसिंचन प्रकल्पातून पाणी घेणार होती. मात्र, याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर आज उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी उच्च न्यायालयाने खेळपट्टीच्या देखभालीसाठी पवना प्रकल्पातून पाणी घेणे बेकायदाच आहे, असे मत नोंदवले.
दरम्यान, एप्रिलमध्ये झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत आयपीएलसाठी पवना प्रकल्पातून पाणी घेण्यास अनुमती दिली होती. मात्र, आता हा आदेश दिल्याने गहुंजेसाठी मैदानासाठी या प्रकल्पातून पाणी घेता येणार नाही.

