Published On : Fri, Apr 9th, 2021

डॉ.नितीन राऊत हे नागपूर जिल्ह्याचे की फक्त उत्तर नागपूरचे पालकमंत्री? : ॲड. धर्मपाल मेश्राम

Advertisement

नागपूर: दुर्बल घटक योजनेअंतर्गत दलित वस्ती सुधारसाठी नागपूर जिल्ह्याला प्राप्त १०० कोटी निधी मधील ५० टक्के रक्कम एकट्या उत्तर नागपूरात खर्च करणारे डॉ. नितीन राऊत हे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत की फक्त उत्तर नागपूरचे, असा सवाल भाजपा प्रदेश सचिव तथा प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

दलित वस्ती सुधारकरिता राज्य शासनाद्वारे नागपूरसाठी १०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. मात्र या एकूण निधीपैकी ५० कोटी रुपये निधी एकट्या उत्तर नागपुरात व व बाकी ५० कोटी रुपये निधी उर्वरित नागपूरमध्ये खर्च करण्याचा प्रस्ताव पालकमंत्री नितीन राऊत यांच्यामार्फत ठेवण्यात आला. अशा पद्धतीने असमान निधीचे वाटप प्रस्तावित करून पालकमंत्र्यांनी नागपूर शहर, जिल्हा आणि इतर दलित बहुल वस्त्यांवर अन्याय केला नाही का, असाही सवाल ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

मागील अनेक वर्षात उत्तर नागपूरचा समन्यायी विकास होऊ शकला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना ते सरकार आणि त्या सरकारमधील मंत्री म्हणून स्वतः नितीन राऊत यासाठी जबाबदार आहेत. ते आजपर्यंत कोणताही निधी शासनाकडून खेचून आणू शकलेले नाही आणि यावेळी सुध्दा त्यांनी हक्काचा दलित वस्ती सुधारसाठी जो १०० कोटी निधी प्राप्त झाला त्यामधील पैसा पळवून नेला. स्वतःचा मतदार संघ असलेल्या उत्तर नागपूरच्या विकासासाठी वेगळा निधी शासनाकडून खेचून आणण्यात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत अपयशी ठरलेले आहेत, असा आरोप ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.