नागपूर – रात्रीच्या वेळेस जेव्हा एखाद्या शहराचे चौक दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतात, तेव्हा ते दृश्य नक्कीच मोहक वाटते. पण या झगमगाटामागे जर वाहतूक सुरक्षेचा बळी जात असेल, तर ते मोहक दृश्य गंभीर प्रश्नांची मागणी करू लागते. नागपूरच्या मुख्य चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या LED जाहिरात फलकांच्या बाबतीतही हेच चित्र दिसत आहे. नियमांच्या स्पष्ट उल्लंघनासोबतच महापालिकेच्या भूमिकेवर शंका घेतली जात आहे.
नियम काय सांगतात आणि प्रत्यक्षात काय घडतेय?
महाराष्ट्र महानगरपालिका (आकाशचिन्हे आणि जाहिरातींचे नियमन व नियंत्रण) नियम, 2022 नुसार, LED फलकांवर केवळ स्थिर जाहिराती दाखवण्यास परवानगी आहे. तसेच, एक जाहिरात जाऊन दुसरी सुरू होईपर्यंत किमान १० सेकंदांचे अंतर असणे आवश्यक आहे. परंतु नागपूरमधील RBI चौक, शंकरनगर चौक, लॉ कॉलेज चौक यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी याचे बिनधास्त उल्लंघन होताना दिसतेय. गतिमान व्हिडिओ, झपाट्याने बदलणारी दृश्यं, अत्यंत तेजस्वी प्रकाश हे सर्व वाहतुकीसाठी धोकादायकच ठरत आहेत.
‘कारवाई’ की ‘औपचारिकता’?
महानगरपालिकेचे उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी तीन जाहिरात कंपन्यांना – साईनपोस्ट, वर्षा अॅडव्हर्टायझिंग, आणि एका अज्ञात एजन्सीला नोटिसा बजावल्या आहेत. यात स्पष्टपणे नियम 5(i)(iv), 5(a), आणि 5(s) चे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. पण याच LED फलकांना पूर्वीही तक्रारी झाल्या होत्या. मग इतक्या उशिरा ही कारवाई का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे, नोटीस देऊनही जर फलक पूर्ववतच सुरु राहतील, तर ही कारवाई केवळ कागदोपत्री असल्याची शंका उपस्थित होते.
वाहतुकीचा गोंधळ आणि अपघाताचा धोका-
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, या गतिमान LED फलकांमुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होते. विशेषतः रात्री, फलकांचा तेजस्वी प्रकाश वाहतूक सिग्नल्सच्या दिव्यांपेक्षा अधिक झगमगतो, त्यामुळे सिग्नल्स नीट दिसत नाहीत. परिणामी, वाहतुकीत गोंधळ निर्माण होतो आणि अपघाताची शक्यता वाढते.
‘परिवर्तन – द सिटिझन्स फोरम’ या नागरी संस्थेने महापालिकेकडे या प्रकरणात कारवाईची मागणी करत यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतरच प्रशासनाने पहिल्यांदाच काहीसे सक्रियपणे पावले उचलल्याचे दिसून आले.
‘ब्रँड’ महत्वाचा की ‘ब्रेक’?
महापालिकेच्या भूमिकेवर यामुळे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात. एका बाजूला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फलकांना नोटीस बजावली जाते, आणि दुसऱ्या बाजूला हेच फलक शहरभर दिसतच राहतात. म्हणजेच, नियम आणि वास्तव यामधील दरी अधिकच ठळक होतेय. हा दुटप्पीपणा नुसता नियमांचा अपमान करत नाही, तर नागपूरकरांच्या सुरक्षिततेलाही कमी लेखतो.
काय गरज आहे – झगमगाट की जबाबदारी?
आज नागपूरच्या रस्त्यांवर फक्त वाहनांचा वावर नाही, तर तितक्याच संख्येने चालत जाणारे नागरिक, विद्यार्थी, वृद्ध आणि बालकंही आहेत. या सर्वांचं रस्त्यावरील अस्तित्व ‘ब्राईट’ जाहिरातींपेक्षा महत्त्वाचं नाही का? LED फलकांचे नियंत्रण आणि नियमन हे केवळ सौंदर्यासाठी नाही तर सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
दरम्यान महापालिकेने या प्रकरणात काही प्रमाणात पावले उचलली आहेत, पण ती तात्पुरती की ठोस – हे वेळच सांगेल. जर भविष्यातही हे फलक तसेच सुरू राहिले, तर नागपूर महापालिकेवर ‘मूक संमती’चा आरोप होणार, यात शंका नाही. शहराचा सौंदर्य वाढवताना, त्यात सुरक्षिततेचा घटक अनिवार्यपणे अंतर्भूत असायला हवा.कारण, नियम झगमगतात, पण जबाबदारी अंधारात हरवू नये!