
नागपूर: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम आता भारतातील विमान वाहतूक क्षेत्रावरही दिसू लागला आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या तसेच विमान इंधन (ATF) च्या किंमतींमध्ये झालेल्या मोठ्या वाढीमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने देशांतर्गत उड्डाणांच्या तिकिटांवर 399 रुपयांपर्यंत अतिरिक्त सरचार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे तेलपुरवठ्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे जेट फ्यूलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम जगभरातील विमान कंपन्यांवर होत आहे.
विमान कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या एकूण खर्चापैकी सुमारे 30 ते 40 टक्के खर्च हा इंधनावर होतो. त्यामुळे इंधनाच्या किंमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम विमान तिकिटांच्या दरांवर होतो.
तज्ज्ञांच्या मते, जर मध्यपूर्वेतील युद्ध आणखी काळ चालू राहिले किंवा तेलपुरवठ्यावर परिणाम झाला, तर आगामी काळात विमान तिकिटांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनीही वाढलेल्या इंधन खर्चामुळे भाडेवाढ सुरू केली आहे.
एव्हिएशन क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की युद्धामुळे तेलाच्या किंमतींमध्ये वाढ आणि काही हवाई मार्गांमध्ये बदल यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढत आहे. अखेरीस या वाढीव खर्चाचा भार प्रवाशांवर पडत असल्याचेही ते सांगतात.








