नवी दिल्ली : स्वकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात बदल घडवून आणणाऱ्या उद्योजिकांचा सन्मान करण्यासाठी नीती आयोगाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ॲवार्ड २०१८’ साठी आवेदन मागविण्यात आले आहेत. आवेदनाची अंतिम तारीख ३० जून २०१८ आहे.
नीती आयोगाच्या वतीने दरवर्षी ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग ॲवार्ड’ देण्यात येतात. ‘महिला आणि उद्योजकता’ असा यावर्षीच्या पुरस्काराचा विषय असून पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. नीती आयोग व संयुक्त राष्ट्र संघाच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. नुकतेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातील निवासी समन्वयक युरी अफानसासीइव यांनी या पुरस्कारासाठी देशभरातील महिला उद्योजिकांना आवेदन करण्याचे आवाहन केले आहे.
महिलांमधील शक्ती ओळखून त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा योग्य सन्मान करण्यासाठी व लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी नीती आयोगाच्या वतीने देशातील कर्तृत्चवान महिलांना ‘वुमेन ट्रान्सफॉर्मिंग ॲवार्ड’ प्रदान करण्यात येतो. विविध अडचणींचा सामना करत पंरपरागत चाकोरी मोडीत काढणाऱ्या देशातील महिलांकडून या पुरस्कारासाठी आवेदन मागविण्यात आले आहेत. तसेच, या उद्योजिकांकडून महत्त्वाच्या विकास कामांपुढील आव्हानांबाबत उपाययोजना सुचविण्याचे आवाहनही यासोबत करण्यात आले आहे. +91-7042648877 या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल करून आवेदकांना आवश्यक माहिती व मदत करण्यात येणार आहे. ३० जून २०१८ ही आवेदनाची अंतिम तारीख आहे.
