Published On : Sun, Jun 14th, 2020

आर्थिक सुधारणांसाठी केंद्र शासन सकारात्मक : नितीन गडकरी

Advertisement

आयबीपीसी पदाधिकार्‍यांशी ई संवाद

नागपूर: कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आवश्यक असेल्या आर्थिक सुधारणा करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले असून त्याचे परिणाम दिसणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

इंडियन बिझिनेस अ‍ॅण्ड प्रोफेशनल कौन्सिलच्या पदाधिकार्‍यांशी गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. आर्थिक सुधारणांमध्ये चांगले प्रशासन, सुशासन, योग्य परिणामकारक निर्णय, पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे सरकार देत आहे. तसेच आर्थिक सुधारणा ही सतत सुरु असलेली प्रक्रिया असून या अंतर्गत अनेक चांगले निर्णय होत असल्याचेही गडकरी म्हणाले.

एमएसएमईची व्याख्या आम्ही बदलली आहे. लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे महत्त्व वाढले आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नात एमएसएमईचा 29 टक्के सहभाग कआहे. 48 टक्के निर्यात आणि 11 कोटी रोजगार या विभागाने उपलब्ध करून दिले आहेत. आता तर एमएसएमई स्टॉक एक्सचेंजची सुरुवातही आम्ही करणार आहोत. या माध्यमातून देशातील आणि परदेशातील भांडवल उद्योगांसाठी उभे राहील, असे सांगताना गडकरी म्हणाले- आज अनेक देश चीनशी व्यापार-व्यवहार करू इच्छित नाही. या संधीचा भारताला फायदा होईल. उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञान, कौशल्य असलेले मनुष्यबळ आमच्याकडे उपलब्ध आहे. त्याद्वारे आम्ही निर्यातीस प्राधान्य देत आहोत. तसेच खाजगी वित्तीय संस्थांमार्फत परकीय गुंतवणूक येऊ शकते काय, याचा प्रयत्नही आम्ही करीत आहोत.

राष्ट्रीय महामार्ग बांधत असताना 22 राष्ट्रीय हरित महामार्ग आम्ही बांधत आहोत. मुंबई-दिल्ली महामार्गाचे उदाहरण देताना गडकरी यांनी सांगितले की, या महामार्गाची आखणी करताना भूसंपादनात आम्ही कोट्यवधी रुपयांची बचत केली. जंगल आणि आदिवासी क्षेत्रातून या रस्त्याची आखणी केल्यामुळे जंगल आणि आदिवासी क्षेत्राचे महत्त्व वाढणार आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध उद्योगांचे क्लस्टर तयार करण्याचा आमचा विचार आहे.

येथे सुरु होणार्‍या उद्योगांना पोर्ट, रेल्वे, बस स्टेशनशी जोडले जाणार आहे. तसेच पाणी, वीज, निवासस्थाने या सुविधाही तेथे उपलब्ध होतील. स्मार्ट व्हिलेज ही संकल्पनाही राबविली जाणार आहे. त्यामुळे या जागांचा विकास होईल आणि जास्तीत जास्त उद्योग एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील. यामुळे उत्पादन किंमतही कमी होईल, असेही ते म्हणाले.

कोरोना विषाणूचे परिणाम आज संपूर्ण जग भोगत आहे. आर्थिक युध्दाचा सामना करावा लागत आहे. यातूनही मार्ग काढावा लागणार आहे. कोरोनाचे संकट हे तात्पुरते संकट आहे. निराशेतून बाहेर येऊन सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.