
नागपूर : ‘वंदे मातरम’चा अवमान करणे म्हणजे देशाच्या संस्कृती, राष्ट्रभावना आणि देशभक्तीचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे राष्ट्रभावनेशी निगडित बाबींचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर नाराजी-
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावरही बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. चव्हाण हे अनुभवी नेते असून, केवळ चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
गोपीनाथ मुंडे यांनी भाजपच्या उभारणीत मोठे योगदान दिले असून पक्षाने त्यांचा योग्य सन्मान केला आहे. जन्म आणि मृत्यू कोणाच्याही हातात नसतो. एखादी व्यक्ती हयात नसताना तिच्याबाबत वक्तव्य करताना शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चव्हाण यांनी कोणत्या व्यक्तीबद्दल आणि कोणत्या संदर्भात बोलत आहोत, याचा विचार करूनच वक्तव्य करावे, असे बावनकुळे म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करण्याचे आवाहन-
निवडणूक आयोगाच्या यंत्रणेविरोधात सातत्याने आरोप करणे हे संविधानिक संस्थांवरील अविश्वास निर्माण करणारे असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. आमदार रोहित पवार यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
एसआयआरच्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांच्या बूथ लेव्हल कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. बूथ लेव्हल अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामावर सर्व पक्षांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पात्र मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळले जाणार नाही, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणूक प्रक्रियेवर आरोप करण्याऐवजी तिच्यात पारदर्शकपणे सहभागी होण्याची गरज आहे. रोहित पवार हे नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला.
पुरके आश्रमशाळेची पुन्हा पाहणी-
पुरके आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबतही बावनकुळे यांनी भूमिका स्पष्ट केली. वसंतराव पुरके यांनी भाजपविरोधात भूमिका घेतल्यामुळे हा विषय उपस्थित झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील स्वच्छतागृहांना दरवाजे नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची आदिवासी विकास विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. विभागाच्या सचिवांशी चर्चा करून संबंधित आश्रमशाळेची पुन्हा पाहणी करण्याच्या सूचना दिल्या जातील, असे बावनकुळे यांनी सांगितले.




