Published On : Thu, Oct 12th, 2017

फवारणीमुळे बाधित झालेल्या शेतकरी कुटूंबियांना तात्काळ मदत देणार – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

· शेतकरी कुटूंबियांच्या घरी जावून केले सात्वन
· किटकनाशकासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करा
· मृतकांच्या कुटूंबियांना आर्थिक सहाय्य
· कळमेश्वर, खैरगाव गावांना भेट


नागपूर:
शेतपीकांवर औषध फवारणी करताना शेतकऱ्यांचा दुरदैवी मृत्यूमुळे शेतकरी कुटूंबावर मोठा आघात झाला आहे. अशा प्रसंगी शासनातर्फे आवश्यक ते संपूर्ण सहाय्य करण्यात येईल. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज या दूरदैवी घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या घरी जावून कुटूंबियांचे सात्वन केले तसेच मदतीचा विश्वास दिला.

कळमेश्वर येथील मृतक शेतकरी माणिकराव सदाशिव शेंडे यांच्या निवासस्थानी भेट देवून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीमती वंदना माणिकराव शेंडे व मुलगा वैभव शेंडे यांची भेट घेवून त्यांचे सात्वन केले. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख त्यांचेसमवेत उपस्थित होते.
मौजा पिपळारीठी येथे शेतपीकांवर किटकनाशक फवारणी करताना प्रकृती खराब होवून विषबाधेने उपचारादरम्यान शेतकरी माणिक सदाशिव शेंडे यांचे निधन झाले. त्यांनी त्यांच्या शेतात पी.एस. ग्रासिल नावाचे औषध शेतपीकांवर फवारणी करतेवेळी बेशुध्द झाल्याचे कळताच त्यांना उपचारासाठी कळमेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. त्यानंतर आरेंजसिटी हॉस्पीटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुरदैवी घटनेमुळे शेंडे कुटूंबियांवर मोठा आघात झाला असून घरातील कर्तापुरुषाचे निधन झाल्यामुळे शेतकरी कुटूंबास अपघात विमा योजनेसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा अशा सूचना तहसिलदार डॉ. हंसा मोहन यांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात.

शेतपीकांवर औषध फवारणी करताना वापरण्यात आलेल्या किटकनाशकाच्या खरेदी संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशा सूचना देताना पालकमंत्री म्हणाले की, पत्नी वंदना माणिक शेंडे, मुलगी उज्वला, प्रिया व रिना, तसेच मुलगा वैभव व प्रशांत यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. या कुटूंबांवर घडलेल्या दुरदैवी घटनेमुळे शासनातर्फे तसेच वैयक्तिकही कशी मदत करता येईल यादृष्टीनेही प्रयत्न असल्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.


पालकमंत्री यांनी काटोल, नरखेड तालुक्यातील शेतपीकांवर औषध फवारणीमुळे मृत झालेल्या खैरगाव येथील धनजय कृष्णाजी वारोकर यांच्या निवासस्थानी जावून कुटूंबियांचे सात्वन केले. शेतपीकांवर फवारणी करताना दुरदैवी घटना घडू नये यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतावर जावून फवारणी संदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्यात. तालुका कृषी अधिकारी जगदीश नेरुलवार यांनी कृषी विभागातर्फे कृषी विकास व कृषीपूरक उद्योगासाठी योजनाचा लाभ या कुटूंबियांना देण्यात येईल असे यावेळी सांगितले.

यावेळी डॉ. राजीव पोतदार, अरविंद गजभिये, संजय देकाटे, किशोर रेवतकर, प्रकाश वरुडकर, प्रकाश टेकाडे, उकेश चव्हाण, तसेच नगराध्यक्षा श्रीमती स्मृती इखार आदी उपस्थित होते.