जालना: जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाला. या पार्श्ववभूमीवर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मंठा, अंभोरा शेळके, देवठाणा, उस्वद इत्यादी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. या गावांमधील पिकांचे नुकसान झालेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री यांनी दिली.
गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या मंठा व शिवार, अंभोरा शेळके, देवठाणा उस्वद या गावांना पालकमंत्री लोणीकर यांनी तातडीने भेट देऊन ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, अशा काही शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. गहू, ज्वारी, बाजरी यासह द्राक्ष तसेच मोसंबी फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर संकट निर्माण झाले. परंतु पालकमंत्री लोणीकर यांनी सकाळीच जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे व जिल्हा कृषी अधीक्षक दशरथ तांभाळे यांच्याशी चर्चा करून महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकामार्फत सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री लोणीकर यांनी सकाळी ९. ३० वाजता मंठा शिवारात एका शेतात जाऊन तेथील नुकसानग्रस्त गव्हाच्या पिकाची पाहणी केली. अंभोरा शेळके येथे गजानन आघाव, उस्वद येथील पदमाकर उत्तम सरोदे व देवठाणा येथील पंढरीनाथ नानासाहेब देशमुख यांच्या शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
गारांचा मार लागून जखमी झालेल्या शेतकऱ्यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले
मंठा तालुक्यातील अंभोरा शेळके येथील शेतकरी भगवान विशवनाथ शेळके यांना गारांचा मार लागून ते जखमी झाले. ही माहिती कळताच पालकमंत्री लोणीकर यांनी जखमी भगवान शेळके यांची भेट घेऊन त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना अधिक उपचारासाठी कार्यकर्त्यांमार्फत नजीकच्या रुग्णालयात हलविले.
गारपीटग्रस्त भागाची राज्यमंत्री खोतकर यांच्याकडून पाहणी
सकाळी ८ वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी व शासनातर्फे योग्य ती मदत मिळवून देऊ असे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना ग्वाही दिली अस्मानी संकटामुळे आंबा, गहू, द्राक्ष, हरभरा अशा पिकांचं नुकसान झालं. तसेच जालना मतदार संघाच्या गोंदेगाव, पोखरी, वाघरुळ या गावात तात्काळ जाऊन श्री. खोतकरांनी शेतकरी बांधावांना धीर देऊन नुकसान भरपाईचे पंचनामे तात्काळ करण्यात येईल असे खात्रीपूर्ण आश्वासन दिले यावेळी तहसीलदार, बि.डी.ओ सर्व अधिकारी उपस्थित होते.