
नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि मानसिक छळाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या चौकशी समितीच्या भेटीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला. या घटनेत दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्यावर महिला प्रतिनिधींशी गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा समितीचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने बुधवारी महाविद्यालयाला भेट दिली. गेल्या वर्षभरापासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे प्राप्त झाल्यानंतर ही चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मात्र, समितीच्या भेटीदरम्यान महाविद्यालय प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही प्राध्यापकांनी समितीसमोर प्रशासनाच्या दडपशाही धोरणांविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला. मानसिक दबाव टाकणे, विविध कामांसाठी पैशांची मागणी करणे, तसेच आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीचे प्रस्ताव मुद्दाम प्रलंबित ठेवणे, असे आरोप करण्यात आले.
एका महिला प्राध्यापिकेने आतापर्यंत विद्यापीठाकडे २० तक्रारी दाखल केल्याचे सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाला तीन वेळा पत्रव्यवहार केला असला तरी ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/DUnPIUbiiF3/?utm_source=ig_web_button_native_share&igsh=NTc4MTIwNjQ2YQ%3D%3D
दरम्यान, चौकशी समिती येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सामाजिक संघटनांच्या महिला प्रतिनिधींनी महाविद्यालयात धडक दिली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत सुरई ससाई यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी त्यांचे वर्तन उर्मट होते आणि त्यांनी महिलांवर हात उगारल्याचा आरोप ज्योती आवळे यांनी केला. स्मारक समितीच्या दोन सदस्यांनाही मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला आणि पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकाराचा व्हिडिओही समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
या संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ससाई यांच्या स्वीय सहाय्यकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच चौकशी समितीतील इतर सदस्यांनीही या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
या संपूर्ण प्रकारामुळे दीक्षाभूमी परिसरातील वातावरण तापले असून संबंधित संघटनांनी समितीविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. विद्यापीठाच्या चौकशी अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.








