नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिकच तणावपूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून महत्वाचे निर्णय घेतले जात असून देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून, काही महत्त्वाच्या आयात वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात येत असून, रविवारी वायुसेनेचे प्रमुख आणि नंतर नौदलप्रमुखांनी पंतप्रधानांची भेट घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला.
दरम्यान, गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना ७ मे रोजी नागरी संरक्षणावर आधारित मॉक ड्रिल आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. या मॉक ड्रिलद्वारे आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी तपासली जाणार आहे. यासंबंधीची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे.
देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या हालचालींना वेग आला असून सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर दिला जात आहे.