नागपूर – इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईट 6E 5147 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २५ जून रोजी नागपूर विमानतळावर मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. मुसळधार पावसात विमान लँड झाल्यानंतर प्रवाशांना एअरोब्रिजऐवजी जीर्ण झालेल्या बसमध्ये बसवून टर्मिनलपर्यंत नेण्यात आले. या बसची छत गळत असल्याने प्रवाशांना अक्षरशः भिजत टर्मिनल गाठावे लागले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ काही प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो झपाट्याने व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवासी धावपळ करत पावसात बसकडे जाताना दिसतात आणि बसच्या आत टपकणाऱ्या पाण्यामुळे त्रस्त झालेले पाहायला मिळतात. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांचाही समावेश होता.
विशेष म्हणजे या फ्लाईटमध्ये महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशीष जायसवाल आणि सावनेरचे आमदार आशीष देशमुख सुद्धा उपस्थित होते. दोघांनीही माध्यमांशी बोलताना या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री जायसवाल म्हणाले, “या परिस्थितीत प्रवास करणे अत्यंत धोकादायक आणि प्रवाशांसाठी अपमानकारक आहे.”
प्रवाशांनी सांगितले की, पावसाचा अंदाज असतानाही एअरोब्रिजचा पर्याय वापरला गेला नाही, ही गंभीर बेपर्वाई आहे. आधीही नागपूर विमानतळावर अशा अकार्यक्षम सुविधांविषयी तक्रारी झाल्या आहेत. मात्र, त्याकडे गांभीर्याने न घेतल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर नागपूर विमानतळ प्रशासन आणि इंडिगो एअरलाईन्सविरोधात संतापाचा सूर उमटत आहे. प्रवासी संघटनांनी या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी ठोस आपत्कालीन नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा गळक्या बसमधून प्रवाशांची वाहतूक करणे केवळ असुविधाजनक नाही, तर आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. या प्रकरणामुळे नागपूर विमानतळ प्रशासन आणि इंडिगोच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सध्या ही घटना सोशल मीडियावर जोरदार गाजत असून नागरिक आणि प्रवासी संस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.