Published On : Fri, May 3rd, 2019

भारतीय उद्योगांवर ‘सायबर सुपारी’ चे संकट

Advertisement

जेट एअरवेज पहिला मोठा बळी, अजित पारसे

नागपूर: भारतीय सोशल मीडिया वापरणाऱ्यांची मानसिकता व प्रकार बघत , तशी नकारात्मक मोहीम विविध सोशल मीडिया माध्यमांवर नियोजन पद्धतीने राबवली जाते व यालाच ” सायबर सुपारी ” म्हणता येईल . ज्या मुळे बळी ठरलेल्या उद्योग , संस्थेची संपूर्ण विश्वासहर्ता संपून प्रतिस्पर्धी त्याचा काटा काढू शकतात . जेट एअरवेज ‘सायबर सुपारी’चा पहिला मोठा बळी ठरल्याची व भविष्यात देशाबाहेरील उद्योग येथील उद्योगांना ‘टारगेट’ करण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे लोण छोट्या शहरातही पसरल्यास उद्योगांपुढे , व्यावसायिक प्रतिष्ठानांपुढे नवे अपरिचित आव्हान उभे राहण्याची शक्‍यता बळावली आहे. सोशल मिडियाचे घातक रुप अनेकदा समाजापुढे पुढे आले. न्यायसंस्थेने व तपासणी यंत्रणांनी कोणताही न्याय निवाडा करण्यापूर्वीच निर्णायक भूमिका घेऊन सोशल मिडिया व्यक्ति, संस्थांच्या पतनाला कारणीभूत ठरतो आहे . आता सर्वच उद्योगांवर हे संकट असून जेट एअरवेज याचे ताजे उदाहरण असल्याचे सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी नमुद केले.

विमानांना होणार विलंब, प्रवासातील लहान लहान नकारात्मक घटना, प्रवाशांच्या तक्रारींचे वैयक्तिक व्हीडीओ प्रसारित करून नकारात्मक अफवा, बातम्या पसरवून जेटला हवाई वाहतूक क्षेत्रातून बाहेर फेकण्यास फार मोठा हातभार लागला. दुर्दैवाने छुप्या प्रतिस्पर्ध्यांच्या या ‘सायबर सुपारी’चा अंदाज जेट एअरवेज घेऊ शकले नाही. सोशल मिडियावरील नकारात्मक प्रचारामुळे जेट एअरवेजकडे बॅंक, वित्त संस्थांनीही वेळेवर पाठ फिरविली. परिणामी आज जेट एअरवेजसारखी बलाढ्य कंपनी अखेरची घटका मोजत असल्याचे निरीक्षण पारसे यांनी नोंदविले. ‘सोशल मिडिया’च्या वापरासंबंधी सक्षम योजना व यंत्रणा असती तर जेट एअरवेज वाचली असती अन्‌ हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट आले नसते. भविष्यात हा धोका सर्वच उद्योग समूह, वैद्यकीय, प्रतिष्ठान, शिक्षण संस्था, हॉटेल व्यवसाय, ट्रान्सपोर्ट व वाहन उत्पादन, विविध सेवा पुरवठादारांसह शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही आहे. सोशल मीडियाचा वापर वा गैरवापर सत्तेसाठी केला गेला आहे हे सर्वश्रुत आहेच . आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘आयएसआयएस’ या दहशदवादी संघटनेने “सोशल मीडिया वॉरियर फॉर मास डिस्ट्रक्‍टशन” यंत्रणा वापरली व जगभर हिंसा घडवून आणली. याच संकल्पनेचे स्वरूप व्यावसायिक जगतात नव्या ‘सायबर सुपारी’ रूपात दिसत आहे असल्याचे अजित पारसे म्हणाले.

का आले संकट?
जगभरात ‘सायबर सुपारी’ तज्ज्ञांची फळी अखंड कार्यरत असून सोशल मिडियाद्वारे ते कोणत्याही व्यक्ती, संस्था, उद्योग समुहाला सार्वजनिक दृष्ट्या नामशेष करू शकतात ज्याचे परिणाम त्यांच्या व्यवसाय वा आर्थिक विश्वासार्हतेवर होऊन डबघाई येते मात्र, देशातील मोठ्या उद्योग समूहाजवळही इंटरनेट व सोशल मीडिया माध्यमांवर नजर ठेऊन नकारात्मक बाबींना प्रत्युत्तर देण्याची कोणतीच तांत्रिक योजना वा यंत्रणा नाही. त्यामुळे उद्योग समूहांचे पतन होऊन त्याचा प्रभाव संपूर्ण अर्थव्यवस्थेवर पडण्याची शक्‍यता आहे.

‘सायबर सुपारी’चे प्रमुख अस्त्र
सोशल मिडियावर अफवा, फेक व्हीडीओ, फोटो टाकणेच नव्हे नकारात्मक चर्चा, नकारात्मक समीक्षा हे ‘सायबर सुपारी’ घेणाऱ्याचे प्रमुख अस्त्र आहे. याशिवाय उद्योग समुहातील अंतर्गत वाद, उद्योजकांचे पारिवारिक वाद , उद्योगाच्या दुबळ्या बाजू मसाला लावून जनतेत नकारात्मक पद्धतीने मांडून विश्‍वासहर्ता संपुष्टात आणणे, वैयक्तिक नकारात्मक मतप्रदर्शन करणे, याबाबींवरही ‘सायबर सुपारी’ घेणारे लक्ष लावून असतात.

गतकाळात गृहनिर्माण संस्था “डीएसके”, जागतिक स्तरावरील ‘पिरामल उद्योग समूह’ला नकारात्मक सोशल मिडियातील हल्ल्यांवर आपली बाजू मांडण्याची संधीच मिळाली नाही. असा धोका आता सर्वच उद्योग, व्यावसायिकावरही आहे. ‘सायबर सुपारी’ घेणाऱ्यांना रोखण्यासाठी धोरण आणि यंत्रणा अस्तित्वात नसल्याने याचा पुरेपूर फायदा देशाबाहेरील उद्योग समूह घेऊ शकतात.

– अजित पारसे, सोशल मिडिया विश्लेषक.