
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण करताना देशाच्या विकासाचा व्यापक व्हिजन मांडला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा उल्लेख करत सांगितले की, त्या भाषणातून संसदेत भारताच्या विकासाचा स्पष्ट सूर उमटला आहे.
पंतप्रधान म्हणाले की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणात देश कसा पुढे जात आहे, विकासाची दिशा काय आहे, याची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. 21व्या शतकाचा पहिला क्वार्टर पूर्ण झाला असून, दुसरा क्वार्टर ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारत आज जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या आव्हानांवर उपाय शोधणारा आणि जगाला आशेचा किरण दाखवणारा देश बनला आहे, असे मोदी म्हणाले. देशाचा जीडीपी वेगाने वाढत असून, त्यावरून भारतीय अर्थव्यवस्थेची मजबुती स्पष्ट होते. सध्याची गती कायम राहिली, तर लवकरच भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा यांसह सर्वच क्षेत्रांत भारताची दमदार वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जगातील 9 देशांशी ट्रेड डील; भारत विश्वासू व्यापार भागीदार
पुढे बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, जग आज नव्या ‘ग्लोबल ऑर्डर’कडे वाटचाल करत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक व्यवस्थेनंतर आता नवी वर्ल्ड ऑर्डर आकार घेत असून, तिचा कल भारताच्या बाजूने आहे. जागतिक पातळीवर भारत आता विश्वासू मित्र आणि व्यापार भागीदार म्हणून ओळखला जात आहे.
गेल्या काही दिवसांत भारताने जगातील प्रमुख 9 देशांशी ट्रेड डील केल्या असून, त्यामध्ये 27 देशांचा समावेश असलेली ‘मदर ऑफ ऑल डील’ही आहे, असे मोदी यांनी सांगितले. याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत, पूर्वीच्या सरकारांच्या काळात भारताची स्थिती अशी होती की एकही देश भारतासोबत व्यापार करार करण्यास तयार नव्हता, असा आरोप काँग्रेसवर केला.








