नागपूर : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आजपासून नागपूर येथे सुरु झाली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते आज गणेशपेठ बसस्थानक परिसरात फित कापून झाला.
यावेळी मंत्री महोदयांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुमेधा राऊत, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, श्रीमती जानकीदेवी बहुद्देशीय संस्थेचे संचालक किशोर कुमेरिया उपस्थित होते.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध असणार आहे. भोजनालय चालवण्यासाठी सद्य:स्थितीत सुरु असणाऱ्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टोरेंट अथवा मेस यापैकी सदर योजना राबविण्यास सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली आहे.
जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच भोजनालयातून शिव भोजन थाळी मिळणार आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सदर भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई आहे. प्रत्येक भोजनालयातील अन्नाचा दर्जा योग्य असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी तपासणी केल्या जाणार आहे.