नागपूर: – साटनवरी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाइट-सक्षम 4G LTE नेटवर्क-इन-अ-बॉक्स (NIB) वर चालणारे स्मार्ट व्हिलेज म्हणून इतिहास घडविणार आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते २४ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे.
हा ऐतिहासिक उपक्रम व्हॉईस कन्सोर्टियम अंतर्गत कार्यरत १४ खासगी कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नातून शक्य झाला आहे. विशेषतः ऑप्टिमस लॉजिक सिस्टिम्स प्रा. लि. आणि स्पेस पल्स टेक्नसोल्युशन्स प्रा. लि., (बंगळुरूस्थित स्टार्टअप), यांनी अत्याधुनिक 4G LTE NIB तंत्रज्ञान सॅटेलाइट कम्युनिकेशनसह एकत्रित करून यशस्वीरित्या उभारले आहे. यामुळे ग्रामीण भागात उच्चगती इंटरनेट कनेक्टिव्हिटी व स्मार्ट सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शेतकऱ्यांसाठी स्मार्ट शेती
साटनवरी येथील शेतकऱ्यांना आता IoT आधारित शेती उपाय उपलब्ध होणार आहेत. मातीतील आर्द्रता मोजणारे सेन्सर, आर्द्रता नियंत्रक, स्वयंचलित पाणी वाल्व्ह, व स्मार्ट पंप यंत्रणा NIB नेटवर्कशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आपले शेत मोबाईल फोनद्वारे दूरस्थपणे पाहणी व नियंत्रण करू शकतील. यामुळे पाणी व्यवस्थापन सुधारेल, अपव्यय कमी होईल व उत्पादनक्षमतेत वाढ होईल.
विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण
गावातील विद्यार्थ्यांसाठी NCERT कार्यक्रम व डिजिटल शिक्षण साहित्य सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीद्वारे उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साधने, संवादात्मक धडे व डिजिटल कौशल्य-विकासाच्या संधी उपलब्ध होतील.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत क्रांती
टेलिमेडिसिन कार्यक्रमांतर्गत, साटनवरीतील नागरिकांना विशेष रुग्णालयांतील डॉक्टरांशी थेट सल्लामसलत घेता येईल. NIB नेटवर्कच्या माध्यमातून ECG, रक्तदाब, SpO₂, साखरेची पातळी, हृदयगती यासारखे महत्त्वाचे आरोग्य मापदंड थेट डॉक्टरांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे अचूक निदान होईल व त्वरित उपचार मिळतील, ज्यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल होणार आहे.
भविष्यातील स्मार्ट व्हिलेजसाठी आदर्श
साटनवरी स्मार्ट व्हिलेज प्रकल्पाने दाखवून दिले आहे की डिजिटल कनेक्टिव्हिटी, IoT आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन च्या साहाय्याने ग्रामीण जीवनात कृषी, शिक्षण आणि आरोग्य सेवा एकत्रित करून कशी प्रगती साधता येते. हा प्रकल्प महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील भावी स्मार्ट व्हिलेजसाठी एक आदर्श ठरणार आहे.
या प्रसंगी स्पेस पल्स टेक्नसोल्युशन्स प्रा. लि. चे प्रवक्ते “श्री. नवनाथ चिखले (प्रमुख – सॉफ्टवेअर)” म्हणाले – “आमचे ध्येय म्हणजे तंत्रज्ञानाद्वारे अगदी दुर्गम भागातील समाजालाही सक्षम करणे. साटनवरी स्मार्ट व्हिलेजमधून आम्ही दाखवून दिले आहे की कनेक्टिव्हिटी शेतकरी, विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रासाठी किती प्रभावी ठरू शकते.”
२४ ऑगस्ट २०२५ रोजी होणारे लोकार्पण महाराष्ट्रातील डिजिटल सशक्त गावांच्या नव्या युगाचा प्रारंभ ठरेल व ग्रामीण विकास व नवनिर्मितीबाबत शासनाच्या कटिबद्धतेचा प्रत्यय देईल.