Published On : Mon, Jun 15th, 2020

नागपूर जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांसाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते आत्मनिर्भर योजनेचा शुभारंभ

Advertisement

नागपूर : आत्मनिर्भर भारत सहाय्य पॅकेज अंतर्गत बिगर शिधापत्रिकाधारकास ज्यामध्ये कलावंत,मजूरवर्ग व इतर गरजुंचा समावेश आहे अश्या व्यक्तींना शासनाकडून मोफत तांदूळ प्रति व्यक्ती 5 किलो व प्रति व्यक्ती 1 किलो चना याप्रमाणे आजपासून डॉ. नितीन राऊत ,पालकमंत्रीनागपूर तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला व धान्य वाटप करण्यात आले. नागपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे सुमारे २६०० लाभार्थी आहेत.

ज्या कलावंत, कारागीर, मजूर इत्यादींजवळ शिधापत्रिका नसल्यास त्यांनी अन्न धान्य वितरण अधिकारी किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आपले नाव, कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्डच्या झेरॉक्स प्रति आणि स्वत:च्या मोबाईल नंबरसह अर्ज सादर करावा . त्यांना तीन दिवसांच्या आत, शिधापत्रिका देण्यात याव्या असे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांचे निर्देश आहेत.

या प्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे,जिल्हा पुरवठा अधिकारी तायडे, अन्न धान्य वितरण अधिकारी सवई व ललित खोब्रागडे विशेष कार्य अधिकारी,बालमुकुंद जनबंधू स्वीय सहाय्यक तसेच के.के.पांडे ,दीपक खोब्रागडे,चेतन तरारे व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.