Published On : Tue, Apr 20th, 2021

येते पंधरा दिवस नागरिकांनी संचारबंदी पाळून सहकार्य करावे : सिंगला

Advertisement

– संचारबंदीबाबत निर्बंधाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे जिल्हा टास्क फोर्सला आदेश

गडचिरोली : जिल्हयात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला असून आता नागरिकांनी आजपासून सूरू झालेली संचारबंदी कडक स्वरूपात पाळून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत त्यांनी याबाबत विविध विभागांना संचारबंदी यशस्वी करण्यासाठी सूचना व आदेश दिले. यावेळी पोलिस अधीक्षक अंकित गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. संचारबंदीची अंमलबजावणी ही नागरिकांवर अवलंबून आहे, त्यांनी विनाकारण बाहेर पडून आपल्यासह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये असे त्यांनी यावेळी आवाहन केले. येणारे पंधरा दिवस जिल्हयातील कोरोना महामारीला थांबविण्यास पुरेसे आहेत.

जर आपण संचारबंदी यशस्वी केली तर कोरोना संसगर्ग् निश्चितच आटोक्यात आणता येईल. तसे झाले नाही तर भविष्यात पुन्हा लॉकडाऊनचा मार्ग स्विकारणे सर्वांनाच त्रासदायक होईल. येत्या संचारबंदीच्या कालावधीत सर्वांनाच त्रास होईल पण आपण कोरोनाला रोखण्यात यशस्वी होवू याची खात्री आम्हाला आहे असे जिल्हाधिकारी यांनी प्रतिपादन केले. अत्यावशक दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवणे आता गरजेचे आहे. त्या सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून संचारबंदी यशस्वी करावी. प्रशासन नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करणार आहेच, परंतू तशी वेळ इतर दुकानदारांनी व नागरिकांनी येवू देवू नये असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी यांनी संचारबंदीबाबत दिलेल्या आदेशा नूसार आज पासून दिनांक 01 मे, 2021 चे 07.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात (कंटेनमेंट झोन वगळून) ज्या बाबींना शासन व जिल्हा प्रशासनाचे आदेशानुसार सुरु ठेवण्याची परवानगी अनुज्ञेय असेल ते सुरु ठेवण्याची मुभा असेल तर ज्या बाबींना संपूर्ण क्षेत्रात प्रतिबंध आहे त्यांना पुढील आदेशापर्यंत सुरु करता येणार नाही. राज्यामध्ये कलम १४४ लागू केले आहे. कोणत्याही वैध कारणांशिवाय किंवा आदेशात अंतर्भूत केलेली परवानगी असल्या शिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणीही ये-जा करणार नाही. यात वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवांना सूट दिलेली आहे आणि त्यांचे व्यवहार व कार्ये अनिर्बंधितपणे चालू असतील.

अत्यावश्यक सेवांमध्ये पुढील सेवांचा समावेश होतो
रुग्णालये, रोग निदान केंद्रे, चिकित्सालये, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध विक्रेते, औषध निर्माण कंपन्या, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा. व्हेटरीनरी हॉस्पीटल्स, ॲनिमल केअर सेंटर्स, पेट शॉप्स अंडी, चिकन, मांस, मोस, तसेच जनावरांचा चारा आणि या सर्व बाबींकरिता आवश्यक असलेले कच्चा माल, गोदामे जीवनावश्यक असलेल्या पशुजन्य पदार्थांचे विक्री किराणा मालाची दुकाने, भाजी पाल्याची दुकाने, दूध पुरवठा केंद्रे(दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यान्न दुकाने(परंतू पान टपरी, पानठेले सुरू ठेवता येणार नाहीत). कोल्स्ड स्टेारेज संबंधित सेवा, सार्वजनिक परिवहन – रेल्वे गाड्या, टॅक्सी, ऑटो रिक्षा व सार्वजनिक बस, भारतीय रिझर्व बँकेने विनियमित केलेल्या संस्था आणि स्वतंत्र प्राथमिक विक्रेते, सीसीआयएल, एनपीसीआय, प्रदान प्रणाली कार्यचालक व भारतीय रिझर्व बँकेने विनियमित केलेल्या बाजारांमध्ये काम करणारे वित्तीय बाजार भागीदार, यासह मध्यस्थ संस्था. स्थानिक प्राधिकरणांद्वारे केली जाणारी मान्सून पूर्व (पावसाळापूर्व) कामे. स्थानिक प्राधिकरणांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा.

मालवाहतूक, टेलिकॉम सेवाशी संबंधित देखभाल,दुरुस्तीची कामे, पाणी पुरवठाशी संबंधित कामे, कृषी संबंधित सेवा. ई- वाणिज्य (केवळ अत्यावश्यक साहित्यांचे पुरवठासंदर्भात), अधिस्वीकृत प्रसारमाध्यमे. परंतू इलेक्ट्रॉनिक दुकाने मोबाईल कम्प्यूटर दुकाने बंद असतील. पेट्रोलपंप आणि पेट्रोलियमशी संबंधित असलेली उत्पादने, विदाकेंद्रे (डेटासेंटर्स) क्लाऊड सेवा पुरवठादार, निर्णायक स्वरूपाच्या (क्रिटिकल) पायाभूत सुविधा व सेवा यांना सहाय्यभूत असणाऱ्या माहिती तंत्रज्ञान सेवा. शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा.

फळ विक्रेते सर्व बँकेतर वित्तीय महामंडळे. सर्वसूक्ष्म वित्त पुरवठा संस्था. वकिलांची कार्यालये सीमा शुल्क गृह अभिकर्ते/लसी /जीव रक्षक औषधे/औषध निर्मितीशी संबंधित उत्पादने यांची वाहतूक करण्यामध्ये सहयोगी असलेले लायसनधारक बहु प्रतिमान वाहतूक कार्यचालक. घरगुती मदतनीस/ चालक/स्वयंपाकी यांना, रात्री ८ नंतर आणि/किंवा सप्ताहांत दिवशी येण्यास मुभा असेल. विद्युत पुरवठाशी संबंधित कामे इंधन गॅस पुरवठा, बँकांची एमटीएम्स, पोस्टल सेवा, पावसाळ्यात आवश्यक असणात्या महत्त्वाच्या साधनसामुग्रीशी संबंधित उत्पादने, आपले सरकार केंद्र/सीसीसी/सेतु केंद्र, अत्यावश्यक सेवामध्ये मोडणाऱ्या बाबींकरिता पॅकेजिंग करणारी उत्पादने. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजार व मॉल सर्वकाळ बंद राहतील. जिल्हयात अत्यावश्यक सेवा सोडून इतर आस्थपनांबाबत सविस्तर आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत त्याचा संदर्भ सर्व नागरिकांनी घ्यावा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.