Published On : Mon, Oct 14th, 2019

लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भुमीका- जिल्हाधिकारी

Advertisement

नागपूर : लोकशाही बळकट करण्यात प्रसारमाध्यमांची मोलाची भुमीका आहे. प्रसारमाध्यमांनी मतदार जागृतीसाठी प्रशासनाला सहकार्य करून लोकशाही सदृढ करण्यात महत्वाची भुमीका बजवावी असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज केले.

संपादकांसोबत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छपत्रपती सभागृहात ते संपादकांसोबत विधानसभेच्या निवडणूकीसंदर्भात संवादसाधत होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, मतदान करण्यासाठी प्रशासानातर्फे मतदारांना स्वीप व अन्य मतदार जागृतीच्या कार्यक्रमातुन आवाहन करण्यात येत आहे.

साधारण 70 हजार विद्यार्थ्यांकडून पालकांनी मतदान करावे असे संकल्पपत्र देखील भरून घेण्यात आले आहे. मतदानासाठी दिव्यांग व्यक्तींना केंद्राठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बि.एल.ओ मार्फत चिठ्ठी वाटप करण्यात येणार आहे. पोस्टाच्या माध्यमातून जलदगतीने पोस्टल बॅलेटचे वाटप करण्यात येईल.

यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी वर्तमानपत्रातुन मतदारांना आवाहन करणे व विविध संदेशाच्या माध्यमातून संपर्क करण्याच्या मुद्दयावर चर्चा झाली. निवडणूक प्रक्रीया राबविण्यासाठी 19 हजारांपेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनाही आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेट पेपर उपलब्ध करून दिले आहे. कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही अशी प्रशासनाची भुमिका आहे. स्वीप उपक्रमांतर्गत पथनाट्य, महिला बचत गट आदिद्वारे मतदार जागृती करण्यात येणार असल्याचेही श्री. रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.

मतदारांनी मतदान करावे यासाठी संपादकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे ग्वाही यावेळी दिली. यावेळी संपादक सर्वश्री गजानन जानभोर (लोकमत), देवेंद्र गावंडे (लोकसत्ता), श्रीपाद अपराजीत (महाराष्ट्र टाईम्स), मणिकांत सोनी (दै. भास्कर), शैलेश पांडे (दै. सकाळ), भास्कर लोंढे (लोकशाही वार्ता), रमेश कुळकर्णी (पुण्यनगरी), राहूल पांडे (दै. हितवार) संजय तिवारी (नवभारत), धनराज गावंडे (नवराष्ट्र), चारूदत्त कहु (तरूण भारत) आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदिप मैत्र आदि संपादक उपस्थित होते.