Published On : Thu, Aug 29th, 2019

शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तात्काळ मदत करा – अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर, : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात. बचत भवन सभागृहात जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले.

यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, पोलिस, कृषी, सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्यासंदर्भात 16 प्रकरणे जिल्हा निवड समितीसमोर प्राप्त झाली आहेत. त्यासंदर्भात संपूर्ण अहवाल येत्या 10 सप्टेंबरपर्यंत जिल्हा निवड समितीसमोर ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले.

काटोल तालुक्यातील दिग्रस बु. येथील विजय जयसिंग ढवळे, या 35 वर्षीय शेतकऱ्याने युनियन बँकेच्या काटोल शाखेतून 2016 मध्ये 1 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. ते थकित असल्यामुळे आणि शेतातील नापिकीमुळे तो कर्जाची परतफेड करु शकला नाही. तसेच घर खर्चासाठी सुमारे 5 लाख रुपयांचे कर्ज होते. संबंधित शेतकऱ्याच्या वारसांना तात्काळ मदत देण्यासंदर्भातही यावेळी निर्देश देण्यात आले.

या बैठकीला समितीतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा उप निबंधक, पोलिस उपायुक्त, कृषी सभापती, पंचायत समिती सदस्य आणि उपविभागीय अधिकारी तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.