नागपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाच्या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्र्यांमधील आरोप-प्रत्यारोप आणि रेती माफियांतील संघर्षाचा फटका स्थानिक टिप्पर व ट्रक ट्रान्सपोर्टरांना बसत असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भिवापूर, उमरेड आणि रामटेक परिसरात अवैध रेती उत्खननावरून वाद वाढत असल्याचे चित्र आहे. रेती घाटांवरील वर्चस्वासाठी सुरू असलेल्या संघर्षात प्रशासनाकडून स्थानिक गरीब ट्रान्सपोर्टरांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो टिप्पर मालक नियोजन भवन येथे दाखल झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देत स्थानिक ट्रान्सपोर्टरांवरील कारवाई थांबवण्याची मागणी केली.
आंदोलकांनी प्रशासनाने मोठ्या रेती माफियांवर कारवाई करण्याऐवजी छोट्या टिप्पर चालकांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. तसेच स्थानिक वाहनधारक आणि चालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले.









