Published On : Thu, Dec 27th, 2018

तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला- अजित पवार

Advertisement

मुंबई : टोमॅटोला…कांदयाला भाव नाही…दुधाला अनुदान नाही…शेतकऱ्यांनी मग करावं काय ? निवडणूका जवळ आल्यावर महत्वाच्या मुद्दयांना बगल दिली जाते. तुम्हाला जमत नाही मग घोषणा करता कशाला असा संतप्त सवाल सरकारला राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजितदादा पवार बोलत होते. यावेळी अजितदादा पवार यांनी सत्ताधारी पक्षातील वाचाळवीरांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाच शिवाय सरकारच्या नुसत्या पोकळ घोषणांचाही समाचार घेतला.

सरकार निव्वळ पोकळ घोषणा करत आहे. संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना ६ ते ७ महिने पेन्शन दिली जात नाही. मात्र जाहिरातींवर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. सरकारच्या यासह अनेक चुकीच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तनाची मोहिम हाती घेतली असल्याचेही अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी अजितदादा पवार यांना पत्रकारांनी काही प्रश्न केले त्या प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली. शिवाय आघाडीबाबत बोलताना अजितदादा पवार यांनी आघाडी होताना आमची मागे-पुढे सरकण्याची भूमिका राहणार असून मित्रपक्षांशी तशी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचेही स्पष्ट केले.

सरकार शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार आहे की नाही? कि, फक्त एप्रिल फूल करणार आहे असा टोला लगावतानाच वेतन आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल असेही अजितदादा पवार म्हणाले.