
पंढरपूर – महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना पुन्हा वेग आला असताना बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. राज्यात आज जनमत चाचणी घेतली तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनाच सर्वाधिक पसंती मिळेल, असा विश्वास कडू यांनी व्यक्त केला.
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि जनसंपर्कामुळे शिंदे हे लोकांच्या अधिक जवळचे नेते ठरले असल्याचे ते म्हणाले. “राज्याची भावना शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहण्याची आहे. आता ही इच्छा देवापुढे मांडण्यापेक्षा थेट जनतेसमोर मांडणार,” असेही कडू यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी शिवसेनेच्या शेतीविषयक धोरणांवरही भाष्य केले. राज्यातील वेगवेगळ्या विभागांतील शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या असल्याने विभागनिहाय धोरण तयार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नांसाठी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही कडू यांनी नाराजी व्यक्त केली.राजू शेट्टी ,महादेव जाणकार आणि इतर नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या प्रकाराचा त्यांनी निषेध केला. आंदोलन करणे हा गुन्हा नसल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवरही बच्चू कडू यांनी भूमिका स्पष्ट केली. यापुढे आपण कोणत्याही एका जातीपुरत्या आंदोलनात सहभागी होणार नसून शेतकरी, दिव्यांग आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर व्यापक पातळीवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.








