नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये मंगळवार ते बुधवारदरम्यान तब्बल 202.4 मिमी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. या संततधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. कुठे घरात पाणी घुसले, तर कुठे रस्ते धसले. शहरातील अनेक रस्ते अक्षरशः तळ्यात रूपांतरित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर परिस्थितीवरून आज नागपूरच्या पश्चिम भागाचे आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत आवाज उठवला आणि राज्य सरकारसोबत नागपूर महानगरपालिकेवरही जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे यांनी मनपाच्या आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, तसेच एमएसआयडीसीचे एमडी बृजेश दीक्षित यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ठाकरे म्हणाले की, “गेल्या वर्षी पावसामुळे झालेल्या स्थितीकडे पाहता, यंदा ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सरकारने विविध कामांना मंजुरी दिली होती. पण ती कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत आणि त्यामुळेच नागपूरकर पुन्हा पाण्यात अडकले आहेत.”
ते पुढे म्हणाले, “सरकारने नागपूरमध्ये एक लाख कोटींच्या विकासकामांचा दावा केला आहे, मग हे काम झाले असेल तर आज अशी परिस्थिती का निर्माण झाली?” असा रोखठोक सवालही त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच ठाकरे यांनी नगर विकास विभागाच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्याची मागणीही सभागृहात केली. तसेच महानगरपालिकेच्या कामांचा ऑडिट करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.
मुख्य मुद्दे :
नागपूरमध्ये अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
एक लाख कोटींच्या विकासकामांचा दावा हवेत?
मनपा आयुक्त आणि एमएसआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
नगरविकास विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह
विधानसभा अधिवेशनात आमदार ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा
नागपूरकरांना दरवर्षी पावसात डुंबावे लागते, पण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे स्थिती बदलत नाही, असा आरोप करत ठाकरे यांनी अखेर राज्य सरकारकडे जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे.