नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समिकरणे बदलत चालली आहे. यातच नवनीत राणांच्या भूमिकेकडे व अमरावतीच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार नवनीत राणा यांनी यासंदर्भात आपली भुमीका मांडली. येत्या लोकसभा निवडणुकीत त्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. या चर्चेसंदर्भात खासदार नवनीत राणा यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
आम्ही एनडीएबरोबर आहोतच, त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखे नाही. जर भाजप पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर नक्कीच भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे राणा म्हणाल्या.
नागपुरात जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या युवक संमेलनाला खासदार नवनीत राणा आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन नागपुरात दाखल झाल्या. राणा यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे हजारो कार्यकर्ते या संमेलनाला उपस्थित राहणार आहे. एनडीएचे घटक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. इतर लोक माझ्याविषयी काय चर्चा करत आहेत? काय बोलत आहेत? यामध्ये पडणार नाही. कोण राजकारणात येणार? कोण राजकारण सोडणार? हा विषय माझा नाही. आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो आणि तेच करत राहणार, असे नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.
दरम्यान राणा दाम्पत्यानी गेल्या ५ वर्षात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचे समर्थन केले. राज्यातील भाजपा नेत्यांच्या बाजुनेच त्यांनी सातत्याने भूमिका मांडली असून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील लढाईत शिवसेनेविरुद्ध आक्रमक पवित्राही घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे, भाजपकडून त्यांना यंदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.