Published On : Mon, Jun 10th, 2019

हुडकेश्वर-नरसाळाच्या नागरिकांना 15 ऑगस्टपूर्वी पाणीपुरवठा करा : पालकमंत्री

Advertisement

पावसाळ्यापूर्वी नालासफाई करा
समस्यांच्या निवेदनावर प्रस्ताव करून 3 दिवसात सादर करा

हुडकेश्वर नरसाळा या भागातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून 15 ऑगस्टपर्यंत सर्व नागरिकांना नळाचे कनेक्शन देऊन पिण्याचे पाणी द्या. एकही कुटुंब पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता मनपा अधिकार्‍यांनी घ्यावी. तसेच जनसंवाद कार्यक्रमात आलेल्या नागरिकांच्या समस्यांसाठी कामाचे प्रस्ताव येत्या 3 दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनपा व जिल्हा प्रशासनाला दिले.

हुडकेश्वर येथील राधाकृष्ण सभागृहात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांकडे समस्या घेऊन येणार्‍या नागरिकांची प्रचंड गर्दी केली. या कार्यक्रमामुळे पालकमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना उपलब्ध होत आहे. या कार्यक्रमाला माजी पंस सभापती अजय बोढारे, डी.डी. सोनटक्के, नगरसेवक भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, श्रीमती हाथीबेड, श्रीमती मडावी, डॉ. प्रीती मानमोडे, जि.प. सदस्य शुभांगी गायधने, किशोर कुंभारे, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगर पालिका, आरोग्य विभाग, साफसफाई, पाणीपुरवठा, दलित वस्तीमधील कामे, महावितरण अशा सर्वच विभागांच्या अधिकार्‍यांना उपस्थित ठेवून संबंधित समस्यांची निवेदने त्यांना देण्यात आली. पावसाळी नाली साफसफाई, रस्त्यांची कामे, सिमेंट रस्त्यांची कामे, पाणीपुरवठ्याच्या जलकुंभाची कामे अशा कामांचा आढावा घेण्यात आला. 4 पैकी 3 जलकुंभाची कामे पूर्ण झाली आहेत.

येत्या 15 ऑगस्टपूर्वी महावितरणने हुडकेश्वर नरसाळा भागातील सर्व पथदिव्यांचे खांब लावून त्यावर दिवे लावावे, अशा सूचना देण्यात आल्या. निधीची कोणतीही कमी नाही. पण काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश देण्यात आले. साफसफाईबाबत कर्मचार्‍यांची रिक्तपदे अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक भागात 15-15 दिवस झाडणारे पोहोचत नाही. तसेच रस्ते उंच झाले आणि नागरिकांची घरे खोल झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी घरांमध्ये घुसते. सिमेंट रस्ते करताना प्रत्येक 10 मीटरवर खाली पाईप टाकण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. साफसफाई मनपाचे कर्मचारी करीत नसल्याच्या तक्रारी जनसंवादमध्ये करण्यात आल्या. खुल्या जागांना संरक्षण भिंती, अनधिकृत व्यवसायावर नियंत्रण या समस्यांकडेे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. अजय बोढारे, डीडी सोनटक्के, भगवान मेंढे, उपस्थित नगरसेविका आदींनी या भागातील समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले.

जनसंवाद नंतर पालकमंत्र्यांनी या भागाचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी यांच्या कामाचा आढावा घेऊन नागरिकांच्या समस्यांवर प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश दिले. प्रत्येक समस्येच्या निवेदनावर कारवाई करण्याचे व त्या सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी जनतेला दिले.