Published On : Thu, Aug 9th, 2018

सूक्ष्म सिंचन योजनेची साखर कारखाने, बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Advertisement

मुंबई : ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेची साखर कारखाने व बँकांनी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, ऊस पिकाखालील क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याबाबतच्या योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती देण्याची आवश्यकता आहे. साखर कारखाने व बँकांनी प्रभावीपणे या योजनेची अंमलबजावणी करावी. जे साखर कारखाने सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करणार नाहीत, त्यांचे वीज खरेदी करारनामे रोखण्यात येतील. तसेच ज्या बँका या योजनेची अंमलबजावणी करणार नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. या योजनेचा साखर आयुक्त कार्यालयाने दररोज साखर कारखाने व बँकांकडून अहवाल घ्यावा.

सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे व अन्य जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँक या योजनेसाठी कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे व साखर कारखान्याचे कर्जासाठी अर्ज आले आहेत, त्यांना तत्काळ मंजुरी देण्याचे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी कृषी व सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह, राज्य सहकारी बँकांचे प्रतिनिधी, नाबार्ड व सहकारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.