मुंबई -राज्यातील शाळांमध्ये ‘हिंदी’ तिसरी भाषा म्हणून सक्तीने लागू करण्याच्या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य शासनाने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यास अनिवार्य केल्याची घोषणा केली. या निर्णयावर जनतेसह विविध पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे.
दादा भुसे-राज ठाकरे यांच्यात महत्त्वपूर्ण भेट-
आज शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्रिभाषा सूत्रावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं की, ‘हिंदी सक्तीचा हेतू नसून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ हे उद्दिष्ट आहे,’ मात्र राज ठाकरे यांनी यावर समाधान व्यक्त केलेलं नाही.
‘हिंदी लादणं स्वीकारार्ह नाही-
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटलं की,महाराष्ट्रात मराठी भाषा अस्मितेचा मुद्दा आहे. इथे हिंदी लादणं आम्ही सहन करणार नाही. त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी थोपवलं जात असेल, तर आम्ही रस्त्यावर उतरू.
६ जुलै रोजी मोर्चा; सर्व मराठी बांधवांना आवाहन-
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ६ जुलै रोजी मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. हा मोर्चा मराठी भाषेच्या हक्कासाठी आणि हिंदी सक्तीविरोधात असणार आहे.माझं सर्व मराठी बांधवांना आवाहन आहे की, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. ही केवळ भाषेची नव्हे, तर आपली संस्कृती आणि अस्तित्वाची लढाई आहे,” असं ते म्हणाले.
मनसेची आक्रमक भूमिका स्पष्ट-
मनसेने गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पक्षाच्या शाखांनी याबाबत आंदोलनेही केली आहेत. राज ठाकरे यांचा ६ जुलैचा मोर्चा हे याच संघर्षाचं पुढचं पाऊल मानलं जात आहे.