नागपूर: राज्यात हवामानातील बदलांमुळे यंदाचा मान्सून वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १० जूनपर्यंत बहुतेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी होईल. केवळ काही निवडक भागांतच हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र जुलैमध्ये अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा १०६ टक्के अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. हे अंदाज तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाच्या कालावधीच्या आधारे लावण्यात आले आहेत. विशेषतः धुळे, राहुरी, परभणी, निफाड, अकोला, पडेगाव आणि कोल्हापूर या भागांत दीर्घकाळ पावसाची शक्यता आहे. तर नागपूर, सोलापूर, पुणे, कराड, जलगाव आणि दापोली येथे पावसाचा कालावधी कमी असला तरी पाऊस अतिशय जोरदार असेल.
जुलैमध्ये कमी वेळात जास्त पाऊस पडणार असून यामुळे अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, ओसाड भागांमध्ये किंवा नाल्याजवळ राहणाऱ्यांनी सतर्क राहावे, तसेच हवामान खात्याचे अपडेट्स वेळोवेळी पाहावेत, असा सल्ला दिला जात आहे. शेतकऱ्यांनीही हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पीक व्यवस्थापनाचे नियोजन करणे गरजेचे आहे.