मुंबई सह राज्यातील अनेक भागांत पावसाने जोर पकडला असून, हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस सोमवारी पहाटेपर्यंतही कायम होता, परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. पुढील काही तासांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील लोकल सेवा, रस्ते आणि बस वाहतुकीवर या पावसाचा थेट परिणाम होत असून, सकाळच्या गर्दीच्या वेळी चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असून, रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा तडाखा
मुंबईसह ठाणे, उपनगर आणि पश्चिम मुंबईत मुसळधार पावसाचा जोर दिसून येत आहे. आकाशात गडद ढग दाटले असून, समुद्रात हायटाईडची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागानुसार, दुपारी ३.३० ते ४.३० वाजेदरम्यान अरबी समुद्रात १४ फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही रात्रभर पावसाचा जोर कायम होता. अनेक भागांमध्ये पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ४०–५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे स्पष्ट आदेश दिले असले तरीही काही मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात गेले असल्याचे वृत्त आहे. जोरदार पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याचा इशारा: घराबाहेर पडताना घ्या काळजी-
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.