
नागपूर : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभाग यांनी १८ एप्रिल २०२६ रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत अधिकारांचा वापर करून १८ एप्रिल (शनिवार) रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
सध्या नागपूर जिल्ह्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असून उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या उन्हात बाहेर पडू नये, पुरेसे पाणी पिण्याचे आणि आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.








