Representational Pic
मुंबई: सांगली जिल्ह्यात वाटेगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हिंसाचार झाला असून मतदान केंद्राबाहेर दगडफेकीत 3 जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली नाहीत, तर काही ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज एकूण 3,692 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.
यामध्ये ठाणे- 14, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग-325, पुणे- 221, सोलापूर-192, सातारा- 319, सांगली-453, कोल्हापूर- 478, नागपूर-238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52,भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26 अशा एकूण 3692 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले.
कोल्हापूरात 50 टक्के मतदान
कोल्हापूर जिल्ह्यातील 439 ग्रामपंचायतीसाठी सकाळी साड़ेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सुमारे 45 ते 50 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. लोकांनी मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने आणि त्यातच शेतीची कापणी मळणीची धांदल सुरू असल्याने शेतकरी वर्गाने सकाळीच मतदानासाठी गर्दी केली.
दरम्यान, नक्षलग्रस्त गोंदियामध्ये संवेदनशील मतदानकेंद्रांवर मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत ठेवण्यात आली. गोंदियातील सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायतील नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.