नागपूर : पालकमंत्री म्हणजे शोभेसारखी वस्तू नसून, सरकार व प्रशासनाचा महत्वाचा दुवा आहे. प्रत्येक व्यक्तीचा पालक असतो. त्यामुळे सरकारचा संपूर्ण लाभ, योजना जनतेपर्यंत पोचविणार, असा निर्धार राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. पत्रकारांना सोबत घेवूनच जनसेवा करू, असे ते म्हणाले.
नागपूर प्रेस क्लब आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमांत ते बोलत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माझा दावा नाही की, आम्ही सगळे बदलवू शकतो पण जनतेच्या भावना लक्षात घेवून प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्की करणार आहे. आम्हाला इतके मोठे यश मिळाले की त्यामुळे जनतेच्या अपेक्षा वाढल्या. पण आव्हानही मोठी आहेत जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य देवून पुढील वाटचाल करू असे सांगून बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने मजबूत मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. जिथे जिथे कुठे कमी पडू तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत. तसे त्यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये सांगितले आहे.
विकासाची गती विस्तारणार
विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरु झाले असून, जनतेने आता निर्धास्त व्हावे, कारण २०१४ ते २०१९ चा विकासाची गती तेज करणारा काळ परत आला असून, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि मी आता विकासाची गती विस्तारणार आहोत, एक एक क्षण हा मला विकासाकरता द्यायचा आहे, असेही बावनकुळे यांनी सांगीतले.
पक्षप्रवेश तिघांच्याशी समजुतीने होतील
महायुतीमध्ये तिन्ही पक्षांमध्ये कुठलाही पक्षप्रवेश करताना महायुतीचे नुकसान न होता ती मजबूत कशी होणार या दृष्टीने पक्षप्रवेश केले जाणार आहेत. एखाद्याच्या प्रवेशाने मात्र महायुती भक्कम आणि मजबूत होत असेल तर त्यासाठी मुभा असणार आहे. मात्र हा निर्णय महायुतीमधील प्रमुख व नेत्यांच्या चर्चेतूनच होईल. महायुतीविरुद्ध जे निवडणुका लढलेले आहे अथवा, भाजपामधील ज्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढली आहे. त्यांना पक्षात घेताना संपूर्ण चर्चा करूनच पुन्हा पक्षात घेतले जाणार आहे अशी सूचना केली आहे. छोट्या स्तरावरचे पक्षप्रवेश करताना मात्र हा विचार नाही. अजित पवारांकडे प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आहे, भाजप आणि शिंदे यांच्याकडे प्रवेश करणाऱ्यांची मोठी यादी आहे. तिन्ही नेते पक्षातील नेते एकत्र बसून कुठला पक्षप्रवेश करून महायुती अधिक भक्कम होईल असेही बावनकुळे म्हणाले. प्रेस क्लब ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रम्हशंकर त्रिपाठी, कोषाध्यक्ष शिरीष बोरकर उपस्थित होते.
अमरावतीमध्ये पालकमंत्री कार्यालय
अमरावतीमध्ये पालकमंत्री कार्यालय असणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत सरकारचा चेहरा नेण्याचे काम करणार आहे. महसूलमंत्री म्हणून पारदर्शीपणे काम करून शेवटच्या व्यक्तीला समाधान मिळेल आणि जनतेची वचनपूर्ती करण्याची जवाबदारी पार पडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.
पत्रकारांच्या निवासाचे प्रश्न सोडविणार
नागपूर आणि अमरावतीमधील पत्रकारांसाठी निवास व्यवस्था बांधण्याचा निर्णय करतो आहे. त्याबाबत लवकरच बैठक घेत असून पत्रकारांच्या निवासासाठी व्यक्तिगत लक्ष घालेल.
दीक्षाभूमीचे प्रश्न मार्गी
पाच वर्षात पालकमंत्री म्हणून एक एक क्षण विकासासाठी द्यायचा आहे. दीक्षाभूमीचा विषय जो कोणता विषय रखडला असेल त्या सर्वांवर बैठक घेणार आहे. रामटेक परिसराचा विकासाचा आराखडा मार्गी लावू. त्यासाठीच बैठकी घेणार असून यात स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले आहे.