Published On : Fri, Aug 28th, 2020

गोपिनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा -कृषी मंत्री दादाजी भुसे

Advertisement

नागपूर: शेतात काम करतांना शेतकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघाताच्या वाढत्या घटना पाहता त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत मिळण्यासाठी कृषी सहायकांनी गावपातळीवरील अशा अपघातांच्या घटनांची स्वेच्छेने नोंद घेवून कार्यवाही करावी. गोपिनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज वनामती येथील आढावा बैठकीत सांगितले.

आमदार आशिष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, विस्तार प्रशिक्षण संचालक नारायण सिसोदे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक अजय कडू, विभागीय उपसहनिबंधक संजय कदम यावेळी उपस्थित होते.

कृषी विभागातील कृषी सहायकापासून तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी शासकीय चौकटीच्या पलिकडे जावून शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. कोरोनाच्या कालावधीतही कृषी विभागाने राबविलेल्या नाविन्यपुर्ण रानभाज्य महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात सोयाबीन व भात पिकाचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र वाढले असून जिल्ह्यात वेळेत जूनच्या दूसऱ्या आठवड्यात पेरण्या झाल्या. जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत 25 ऑगस्ट पर्यंत 712 मिमि म्हणजे 67 टक्के पाऊस झाल्याची कृषी अधिक्षक अधिकारी माहिती श्री शेंडे यांनी दिली. जिल्ह्यात घेतलेल्या शेतीशाळांविषयीही त्यांनी माहिती घेतली. जिल्हयात 171 शेतीशाळा घेतल्या असून पैकी 37 महिला शेतीशाळा घेतल्याची माहिती दिली. अपघात विमा योजनेत आतापर्यंत 51 प्रस्ताव सादर झाले असून त्रुटीपुर्ततेची कारवाई सुरू असल्याचे सांगितले .

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल यानुसार मंडळनिहाय पिकांचे क्लस्टर करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात संत्र्यांचे सहा, भिवापुरी मिर्ची, जवस यांचे प्रत्येकी एक डाळी व कापसाचे चार क्लस्टर तयार करण्यात आले. या पिकांच्या क्लस्टर संदर्भातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा असे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले. खरीप पिक कर्जाचे आतापर्यत 65 टक्के वाटप पुर्ण झाले असून पुर्ण हंगामात अंदाजे 80 टक्क्यांपर्यंत वाटप होण्याची माहिती जिल्हा उपनिबंधक श्री. कडू यांनी दिली.

महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची माहिती मंत्री महोदयांनी जाणून घेतली. पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्याचे सूचना त्यांनी दिल्यात. आतापर्यत जिल्ह्यात 40 हजार 451 शेतकऱ्यांना 347 कोटी कर्ज वाटप झाले आहे. यासोबतच विदर्भात सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. तसेच किडरोग सनियंत्रण माहिती प्रणालीवर (पीडीएमआयएस) माहिती नियमितपणे अपलोड करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बोगस सोयाबीन बियाणाबाबतीत राज्यस्तरावर साधारणत: 453 तक्रारीचा निपटारा करण्यात अशी माहिती त्यांनी दिली.