मुंबई – पंढरपूरच्या वाटेवर निघालेल्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतके अनुदान देण्यात येणार असून, एकूण 2 कोटी 21 लाख 80 हजार रुपयांची मदत वितरित केली जाणार आहे.
या योजनेसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.
लाखो वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सहाय्य – ‘चरणसेवा’
वारकऱ्यांच्या प्रवासादरम्यान तब्येतीची विशेष काळजी घेत ‘चरणसेवा’ नावाचा उपक्रम राबवला जात आहे. या योजनेत 5,000 हून अधिक डॉक्टर, नर्स, फिजिओथेरपिस्ट आणि स्वयंसेवक सहभागी असून, मार्गातील 43 मुक्कामी ठिकाणी वैद्यकीय तपासणी केंद्र उभारली गेली आहेत.
आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालये यांचं संयुक्त सहकार्य यातून मिळणार आहे.
पंढरपूर एकादशीसाठी चोख बंदोबस्त-
6 जुलै रोजी पंढरपूरमध्ये होणाऱ्या आषाढी एकादशी महापर्वासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. 6,000 पोलीस, 3,200 होमगार्ड आणि SRPFच्या 6 तुकड्या सुरक्षा रक्षणासाठी तैनात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान यावर्षी ड्रोनच्या मदतीने संपूर्ण पालखी मार्गावर देखरेख ठेवली जाणार असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. वारी शांततेत, सुसंघटित आणि सुरक्षित पार पाडावी यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.