Published On : Tue, Sep 26th, 2017

शासन योजनांचा लाभ लाभार्थ्यांना लवकरात लवकर द्या : चेतना टांक

Advertisement

नागपूर: गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना घरकुलासोबतच शासनाच्या विविध योजनांचा लाभ लवकरात लवकर देण्यात यावा असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती सभापती चेतना टांक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीची सभा मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात मंगळवारी (ता. २६) पार पडली. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला समितीचे सदस्य नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका दुर्गा हत्तीठेले, मंगला खेकरे, रुतिका मसराम, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, पोहेकर, स्लम अभियंता सुनील उईके उपस्थित होते.

झोपडपट्टी पुर्नविकास कामाची नुकतीच पाहणी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेऊन त्याचे तात्काळ निरसन करण्याचे निर्देश सभापती चेतना टांक यांनी दिले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी एक विशिष्ट कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, असेही त्या म्हणाल्या. झोपडपट्टी भागातील लोकांमध्ये स्वच्छतेबाबत आजही जनजागृती नाही. समाजकल्याण विभागातर्फे एक विशेष कार्यक्रम हाती घेऊन जनजागृती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

तत्पूर्वी श्रीमती चेतना टांक यांनी यापूर्वी झालेल्या समितीच्या बैठकीतील कामाचा आढावा घेतला. समाजकल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणचे श्री. पोहेकर यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. सुमारे ८० हजार अर्ज प्राप्त झाले असून सन २०२२ पर्यंत घरकुलाचा लाभ लाभार्थ्यांना मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

रमाई योजनेअंतर्गत ७४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून १३९० अर्ज प्रतीक्षेत असल्याचे कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर यांनी सांगितले. समिती सदस्य मंगला खेकरे आणि सुनील हिरणवार यांनी झोपडपट्टी भागात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्याची सूचना केली. बैठकीला समाजकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.