नागपूर : लाडक्या गणरायाच्या आगमनाने भक्तिमय झालेल्या वातावरणात आता माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौराईच्या स्वागताची लगबग सुरू झाली आहे. घराघरांत महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात असून, सजावट, पूजेची तयारी आणि पारंपरिक नैवेद्याची लगबग पाहायला मिळत आहे. सोनपावलांनी येणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी महिला वर्गात विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
भाद्रपद शुद्ध अनुराधा नक्षत्रावर १७ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर १८ सप्टेंबर रोजी गौरी पूजन, तर मूळ नक्षत्रावर १९ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये महालक्ष्मीच्या पूजनाचा आणि पारंपरिक उत्सवाचा जागर रंगणार आहे.
गौराई म्हणजे माहेरवाशीण, अशी भावना असल्याने तिच्या आगमनाला घरातील मुली-महिलांसाठी विशेष महत्त्व असते. गौराईच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता करून आकर्षक सजावट केली जाते. विविध प्रकारच्या फुलांनी आणि रांगोळ्यांनी उंबरा सजवला जातो. गौराईची स्थापना केल्यानंतर विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण केला जातो.
गौरी पूजनाच्या दिवशी घराघरांत विविध पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. महालक्ष्मीच्या आगमनाने घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान नांदावे, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न राहता कुटुंबातील आपुलकी आणि परंपरांचा उत्सव ठरतो.
तीन दिवसांच्या या सोहळ्यानंतर १९ सप्टेंबर रोजी भावपूर्ण वातावरणात गौराईला निरोप दिला जाणार आहे. गणरायाच्या उत्सवानंतर आता गौराईच्या आगमनाने घराघरांत पुन्हा एकदा भक्ती, आनंद आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.




