नागपूर : पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील कुकडीखापा धबधब्यावर गेलेल्या नागपूरच्या चार तरुणांवर अचानक संकट ओढावले. धबधब्याच्या परिसरात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने चारही तरुण चट्टानांमध्ये अडकले. प्रसंगावधान राखत त्यांनी मदतीची प्रतीक्षा केली. घटनेची माहिती मिळताच SDRFच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तब्बल १५० फूट खोल दरीत उतरून चारही तरुणांची सुरक्षित सुटका केली. या थरारक बचावकार्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
श्याम बोरकर (२५), अथर्व ओके (२२), मनीष उइके (२५) आणि सतीश बावने (२३) हे रविवारी कुकडीखापा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. धबधब्याच्या मध्यभागातील चट्टानांवर गेल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. वरच्या भागात झालेल्या पावसामुळे काही वेळातच पाण्याचा वेग वाढल्याने त्यांना माघारी येणे कठीण झाले.
पोलिसांना माहिती मिळताच बचावकार्याला सुरुवात-
तरुण अडकल्याची माहिती मिळताच उमरानाला चौकीचे प्रभारी अधिकारी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन SDRFला पाचारण करण्यात आले. काही वेळातच बचाव पथक आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
वेगाने वाहणारे पाणी आणि खोल दरी यामुळे बचावकार्य मोठे आव्हान ठरले. SDRFच्या जवानांनी रस्सीच्या साहाय्याने दरीत उतरत तरुणांपर्यंत पोहोच केली. त्यांच्या सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट आणि लाइफ बॉयचा वापर करण्यात आला. त्यानंतर एक-एक करून चारही तरुणांना सुरक्षित ठिकाणी आणण्यात आले.
दीड तासांच्या मोहिमेनंतर चौघेही सुखरूप-
SDRF कंपनी कमांडर गणेश कुमार धुर्वे यांच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे २ वाजता घटनेची माहिती मिळाली. पथक आवश्यक रेस्क्यू साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले आणि सुमारे तासाभरात तेथे पोहोचले. दुपारी ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष बचावकार्य सुरू झाले. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर चारही तरुणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या घटनेमुळे पावसाळ्यात धबधबे आणि जलप्रपात परिसरात पर्यटन करताना अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. वरच्या भागात पाऊस झाल्यास धबधब्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक चट्टानांवर जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




