
नागपूर : राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाचे संकेत देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपकडे राज्यसभेच्या चार जागा जिंकण्याइतके संख्याबळ असल्याचा ठाम दावा केला. तसेच महसूल विभागात ई-बॉण्ड सुविधा सुरू करून नागरिकांना घरबसल्या मुद्रांक शुल्क भरण्याची मुभा दिल्याचे त्यांनी जाहीर केले.
ई-बॉण्डमुळे व्यवहार सुलभ-
बावनकुळे म्हणाले, आता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने ई-बॉण्ड खरेदी करता येणार असून मुद्रांक शुल्क (ड्युटी) देखील घरबसल्या भरता येईल. महसूल विभागाने उचललेले हे आधुनिक पाऊल सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ची तयारी-
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान राबवण्याची तयारी सुरू असून ७ आणि १४ मार्च रोजी तसेच एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी दोन दिवस मंडळ स्तरावर विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये तुकडेबंदी, जिवंत सातबारा, एन-ए प्रक्रिया यांसह महसूल विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरांना जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून, “मी स्वतःही या शिबिरांना भेट देणार आहे,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीबाबत स्पष्ट भूमिका-
राज्यसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी सांगितले की, पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली असून प्राप्त झालेली नावे केंद्रीय कोअर कमिटीकडे पाठवण्यात येणार आहेत. “भाजपला राज्यसभेच्या चार जागा मिळतील इतके संख्याबळ आमच्याकडे आहे,” असा दावा त्यांनी केला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नेहमीच प्रयत्न असतात आणि मुख्यमंत्र्यांचाही तसाच विचार आहे. मात्र सध्या अटीतटीची परिस्थिती असून एकमत न झाल्यास निवडणूक होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर चर्चा-
मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांवर चर्चा केली जाईल. “चर्चेतून योग्य तो मार्ग काढला जाईल,” अशी भूमिका महसूलमंत्र्यांनी मांडली.
राजकीय समीकरणे, राज्यसभा निवडणूक आणि महसूल विभागातील डिजिटल बदल या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांच्या विधानांना राज्याच्या राजकारणात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.








