
अमरावती : अमरावती-वरूड मार्गावर झालेल्या भीषण रस्ते अपघातात नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कामठी तालुक्यातील खैरी गावातील विनायक नगर येथील समाधान किसन नाने हे आपल्या कुटुंबासह चारचाकी ट्रव्हेरा वाहनाने लग्न समारंभासाठी अमरावतीकडे निघाले होते. सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास वरूडजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला.
या अपघातात ६० वर्षीय समाधान किसन नाने, त्यांचा ३४ वर्षीय मुलगा गोपाल समाधान नाने, सुना किरण गोपाल नाने आणि ३ वर्षीय नात दीया गोपाल नाने यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक समाधान नाने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे खैरी गावात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








